राजमाता जिजाऊंचे विचार आजही महत्वाचे!
निपाणी मावळा ग्रुपकडून जयंती साजरी, नामफलकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण!

निपाणी नगरी प्रतिनिधी ( 13)
राजमाता जिजाऊ मांसाहेब या खऱ्या अर्थाने स्वराज्याच्या प्रेरिका होत्या. त्यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली व रयतेचे राज्य उभे केले. त्यामुळेच आजही आपल्या देशामध्ये सुखाचे दिवस आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशी माता प्रत्येक मुलाला मिळाल्यास या जगाचा उद्धार होईल असे मत उदय शिंदे यांनी व्यक्त केले.
निपाणी येथील मावळा ग्रुप यांच्या वतीने देवचंद कॉलेज नजीक असलेल्या राजमाता जिजाऊ मार्गावर फलकाचे अनावरण करण्यात आले. त्याचबरोबर या ठिकाणी जिजामाता जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
प्रारंभी मावळा ग्रुपचे अध्यक्ष आकाश माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. देवचंद कॉलेज येथे असलेल्या छत्रपती संभाजी नगरकडे जाणाऱ्या रस्त्याला पहिल्यापासूनच राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात आले आहे. पण तसा उल्लेख कुठे आढळत नाही. यामुळे राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून निपाणीतील मावळा ग्रुपने तशा आशयाचा फलक या ठिकाणी उभा केला व त्याचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते झाले.
मावळा ग्रुपचे सल्लागार संजय चिकोड्डे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी हेमंत चव्हाण, अमृत ढोले, इफजुल गवाणे, पृथ्वीराज घोरपडे, संदीप माने, बबन निर्मळे, अजित पारळे, प्रकाश चव्हाण, विकास लोकरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.