तब्बल तीस वर्षांनंतर भरली “पंचक्रोशी विद्यालय नागनुर” येथे माजी विद्यार्थ्यांची शाळा!
सन 1994 - 95" एस एस एल सी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न झाला!

निपाणी नगरी प्रतिनिधी (16)
नांगनुर पंचक्रोशी विद्यालयात तब्बल 30 वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांनी साजरा केला स्नेह मेळावा. सन 1994- 95 साली शिक्षण घेत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन स्नेह मेळावा साजरा केल्यामुळे सर्व पंचकोशीमध्ये कौतुक होत आहे.
प्रारंभी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत माजी विद्यार्थिनी स्वागत गीत म्हणून माता सरस्वती, श्री प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेचे पूजन करून, दीपप्रज्वलन करत कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक शाळेचे माजी विद्यार्थी श्री. विजयकुमार ठिपकुर्ले यांनी केले.
मागील तीस वर्षाच्या शाळेतील आपल्या प्रवासाबद्दल मागवा घेताना विद्यार्थी म्हणाले की मागील 30 वर्षाचा विचार करता आताच्या शिक्षणामध्ये अमुलाग्र बदल झाले असून पूर्वीच्या काळी शिक्षण मिळवण्यासाठी अनेक हालअपेष्टा सहन करत मैलोनमैल चालत येत शिक्षणाचे बाळकडू मिळत असत.
त्याकाळी ग्रामीण भागामध्ये मुलांचे खूप हाल होत असल्या कारणाने अनेकानी सामाजिक जबाबदारी मानत या पंचक्रोशी विद्यालय शाळेची भक्कम अशी पायाभरणी केली. आपली शाळा सन 1983 साली उभारण्यात आली. आपली शाळा उभी करत असताना खूपच संकटांना तोंड द्यावे लागले, इथे शिक्षणाचे दान करणाऱ्या बऱ्याच शिक्षकांनी सात ते आठ वर्षे बिन पगारी काम करीत पंचक्रोशीतील मुलांना शिक्षण देवून महत्तम कार्य केले आहे., ज्या ज्या शिक्षकांनी या शाळेला आपले योगदान देवून ही शाळा पुढे सुरू केली असे थोर शिक्षक लाभणे म्हणजेच आमचे खूप मोठे भाग्य आहे. खरंतर हे योगदान आणि पूर्ण श्रेय या संस्थेचे आहे. त्यापेक्षाही मोठे योगदान म्हटलं तर शिक्षकांचे आहे ज्या शिक्षकांनी या संस्थेचे नाव मोठे केले.
या कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय आयुष्यातील अनेक आठवणींना उजाळा दिला. मनोगत व्यक्त करताना विजयकुमार ठिपकुर्ले म्हणाले आजच्या काळात एक दिवस दुसऱ्या कडे कामाला जायचं म्हटलं तर पहिला पगार विचारला जातो, व नंतर कामावर जायचं की नाही ते ठरवले जाते. हाच विचार जर आमच्या त्यावेळच्या गुरुजनांनी केला असता तर? हा विचार सुद्धा मनाला सहन होत नाही. कारण ज्या शिक्षकांनी बिन पगारी सात ते आठ वर्षे काम करणं खूप मोठी मोलाची गोष्ट आहे. असे शिक्षक आम्हाला लाभले, ज्यांनी आमचा पाया भक्कम केला असे आमचे सर्वांचे लाडके शिक्षक आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री मेंदगुदले सर, श्री. हिरेकुडी सर, श्री. कुलकर्णी सर, श्री.निंबाळकर सर, श्री.कुरणे सर, कै.रावण सर, श्री.भाट सर सौ.बेलगोंद्री मॅडम, कै.कुमठेकर मॅडम, कै.शिवाजी पवार, तसेच कर्मचारी श्री.दत्ता रावण, श्री.अण्णाप्पा केसरकर, या सर्वांनी या शाळेसाठी खूप मोठे योगदान दिले. त्यांची ऋण आयुष्यभर राहणार असून त्यांच्या ऋणातच राहणे आम्ही पसंत करू असे भावनिक मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.पांडुरंग इंगळे. सेक्रेटरी श्री प्रदीप आल्लुरकर तसेच संचालक मंडळ श्री. पांडुरंग पाटील, श्री.रामा रावण, ज्ञानदेव रावण,श्रीमती.रजपूत मॅडम, इतर मान्यवर मंडळाच्या उपस्थितीत जुने मित्र – मैत्रिणी या पंचक्रोशीच्या कुशीत हिरवाईने नटलेल्या निसर्ग रम्य वातावरणामध्ये वसलेल्या “पंचक्रोशी विद्यालय नांगनुर ” या शाळेची कहानी जणू वेगळीच आहे. या शाळेने खूप काही शिकवले, आपल्या शाळेने आणि शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीवर आपण सर्वांनी आपल्या जीवनाची भाकरी भाजली. यातून आपण सर्वजण कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात यशस्वी झालो व काही आमच्या बॅचचे मित्र सैन्य दलामध्ये सेवा करत आहेत.
हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी जवळजवळ सहा महिने प्रयत्न करावे लागले. कारण एका गावचे सर्व विद्यार्थी आणि विध्यार्थीनी जमा करण्यासाठी थोडा कमी वेळ लागेल पण या शाळेत शिकणारे विद्यार्थी हे पाच ते सहा गावचे असल्यामुळे एकत्रित येणे सोपी गोष्ट नाही. यासाठीचे सर्व श्रेय श्री.पांडुरंग माध्याळकर, श्री संतोष पवार आणि श्री विजयकुमार ठिपकुर्ले यांना जाते.
या कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संचालक मंडळ आणि सर्व विध्यार्थी – विध्यार्थीनींनी सहभाग दाखवला. सर्व शिक्षक आणि संचालक मंडळ यांनी सर्वांचे कौतुक केले. शिक्षकांनी सर्व विध्यार्थ्यांना उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं. गेट-टुगेदर म्हणजे फक्त एकत्र येणे हा उद्देश नसून जुन्या आठवणींना उजाळा देण्याची प्रेरणा देणे, जुने मित्र मैत्रिणी 30 वर्षानंतर भेटल्याचा होणारा आनंद हा जणू वेगळाच असतो. काही विद्यार्थी विद्यार्थिनी गावाबाहेरून आले होते , सर्वांनीच या कार्यक्रमाला उपस्थित राहून चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा देवून हा कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.