“पेन्शन देतो” म्हणत गाडीवर बसवलं, आणि सोनं काढून घेतलं!
निपाणीतील या घटनेमुळे डिजिटल मीडियाची ताकद मात्र समाजाला कळाली!

निपाणी नगरी प्रतिनिधी (19)
निपाणीच्या जुना पी.बी. रोडवरील रस्त्यावर एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना नुकतीच उघडकीस आली आहे. निपाणी शिक्कानगर परिसरामध्ये राहणाऱ्या सौ शकुंतला विष्णू कुराडे वय 78 फिजिओथेरपी साठी नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडल्या होत्या. आपले डॉक्टर कडील काम आवरून मंगळवार पेठे जवळुन जाताना वाटेत त्यांना एक अनोळखी भामटा व्यक्ती भेटला. व त्याने आजीला काळजीच्या सुरात म्हटले आजी नमस्कार, तुमच्या घरी गेलो होतो मुलगा घरी नव्हता, घरी मामा होते, मामा म्हणाले तुम्ही डॉक्टर कडे गेला आहात. तुम्हाला डॉक्टर कडे किंवा रस्त्यात भेटतील तुम्ही येथे भेटला बरं झालं. आजीला घेऊन तुम्ही जावा म्हणून मी आलो आहे. “तुमचं पेन्शनंच काम झाले आहे काढून देतो,” चला असं म्हणत त्याने आजींना मंगळवार पेठेजवळून आपल्या दुचाकी वर बसवले. सदर भामट्याने आजीला पी बी रोडवरून खाली स्टॅन्डला न जाता सरळ गाडी घेऊन मंगळवार पेठेतून मेहता कारखान्याच्या रोड पासून हरी नगर मार्गे मुरगूड क्रॉस वरुन सरळ देवचंद कॉलेजच्या दिशेने संभाजीनगर गाठले. तिथे गेल्यानंतर तो आजीला म्हणाला आजी पेन्शनचं काम व्हायचं असेल तर गळ्यातील सर्व जिन्नस काढून या रुमालात ठेवा कारण फोटोत ते दिसलं तर पेन्शन देत नाहीत. असे भासवून जो काय प्रकार केला त्यानंतर आजीला काही आठवत नाही. हीच संधी साधत चोरट्याने रुमालात ठेवलेल्या बोरमाळेसह सव्वा लाखाच्या सोन्यावर डल्ला मारला. व आजीला आहे त्या स्थितीत सोडून पोबारा केला.
सदर ठिकाण हे पी.बी रोडवरील फिजिशियन सेंटरपासून तब्बल तीन किलोमीटर दूर होतं. आजींनी भानावर आल्यावर कुणाला काही न सांगता, तेथून थेट चालत घर गाठलं. धक्क्यात गेलेल्या आजींनी तब्बल आठ दिवस ही घटना घरच्यांपासून लपवून ठेवली. मुलाला काहीही सांगितलं नाही, पण नातवाला एक दिवस ही गोष्ट बोलून दाखवली.
कुराडे आजीनी सदरची घटना आठ ते दहा दिवस घरच्यांपासून लपवून ठेवली होती कारण घरातील लोकांना हा त्रास होऊ नये. व समोरच घरचे शुभकार्य असल्यामुळे त्यांनी बाहेरगावी गेलेल्या नातवाची वाट पाहणे पसंत केले. नातू बाहेर गावावरून आल्यानंतर सर्व घटना सांगितली. नातवाने लागलीच कोणतीही वेळ न दवडता ही घटना आपल्या वडिलांना श्री सुधाकर कुराडे यांना सांगितली. श्री कुराडे यांनी लागलीच पोलीस स्टेशन गाठून तक्रार देण्याचा प्रयत्न केला पण वरिष्ठ अधिकारी नसल्यामुळे तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्यामुळे व प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे त्यांनी लागलीच पी बी रोड, बस स्टॅन्ड, चन्नमा सर्कल, बेळगाव नाका, या ठिकाणचे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे चेक करण्याचे ठरवले. पण त्यांच्या हाती काही लागले नाही. एक शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी मंगळवार पेठ व हरी नगर परिसरातील सीसीटीव्ही चेक केल्यानंतर त्यांना आपल्या आईसाहेब कोणत्यातरी भामटाच्या गाडीवरून जात असल्याच्या दिसल्या. त्याचवेळी श्री कुराडे यांनी ते सीसीटीव्ही फुटेज घेऊन डिजिटल माध्यमांना देऊन सदरची घटना तारीख वार इथंभुत सांगितली. जरी प्रशासनाने उदासीनता दाखवली असली तरी मीडियाने हे प्रकरण उचलून धरल्याने उशिरा का होईना प्रशासनाला जाग आली. व अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करून घेतला. त्या दिवशीच्या घटनेच्या पोस्ट पाहताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. मोठ्या प्रमाणात शेअरिंग आणि प्रतिक्रिया आल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली हे विशेष.
धडा घ्या!…
या घटनेवरून स्पष्ट होतं की, वयोवृद्ध नागरिक हे भामट्यांच्या रडारवर आहेत. अशा घटना रोखण्यासाठी सतर्कता, जागरूकता आणि पोलिसांची तत्परता अत्यंत गरजेची आहे. याशिवाय, सोशल मीडियाचा योग्य वापर हा आजच्या काळात न्याय मिळवण्याचं प्रभावी हत्यार बनलं आहे.
सर्व सीसीटीव्ही बंद, भामट्यांचा चोरी करणं हा छंद…
निपाणी तालुका प्लेस म्हणून नावारूपास आलेल्या निपाणी शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे अनेक प्रयत्न केले असले तरी अजून सीसीटीव्ही कॅमेरे संदर्भात प्रशासन उदासीन का? हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. कारण नगरपालिका, पोलीस प्रशासन, वार्ड नगरसेवक, यापैकी कोणी कॅमेरे बसवायचे यासाठी सुद्धा एकमत नाही. नगरपालिका परिसर नेहमीच गजबजलेला असून देखील त्या ठिकाणी तसेच स्टँड परिसर, बेळगाव नाका, चन्नमा सर्कल, या ठिकाणी देखील कोणताही कॅमेरा चालू नाही हे दुर्दैव. राष्ट्रीय महामार्गाला जाण्यासाठी निपाणीतून सर्वात जवळचा मार्ग म्हणजे मंगळवार पेठ असून देखील त्या चौकामध्ये एखादा सीसीटीव्ही नसणे ही खूप खेदाची गोष्ट आहे. यावर देखील सर्व प्रशासनाने विचार करून तात्काळ सीसीटीव्ही बसवण्याची विनंती नागरिकातून होत आहे.
गाडीला नंबर प्लेट नाही, पण कारवाई पण नाही…
उठ सूट ब्रिजच्या खाली थांबून प्रवाशांना नाहक त्रास देणाऱ्या प्रशासनास स्टॅन्ड वरून येताना त्या भामट्या व्यक्तीच्या गाडीला नंबर प्लेट नाही हे निदर्शनास आले असते तर पुढील घटना घडली नसती. असे परखड मत समाज माध्यमातून व्यक्त होत आहे.
निपाणी नगरी.कॉम नागरिकांना आवाहन करतं… की
“ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी सजग राहा, शंका आली तर तात्काळ स्थानिक पोलिसांशी संपर्क साधा, कोणत्याही ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता सर्व खातरजमा करून घरी एखादा फोन करून किंवा घरी कडून ज्येष्ठांनी निर्णय घ्यावेत.आणि गरज असल्यास सोशल मीडियावर आवाज उठवा!”
जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क: 8884357516 | निपाणी नगरी.कॉम WhatsApp ग्रुपसाठी आपला नंबर लगेच जोडा! व सर्व घडामोडींचा मोफत लाभ घ्यावा.