निपाणी नगरी वृत्तसेवा (19)
श्री बाहुबली विद्यापीठ, बाहुबली संचलित श्री पार्श्वमती विद्यालय, अकोळ येथे संस्थेचे संस्थापक प. पू. गुरुदेव 108 श्री समंतभद्र महाराज यांच्या 38 व्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी विज्ञान प्रदर्शन व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे उपाध्यक्ष राजू पाटील, कार्यकारी संचालक महावीर पाटील, अनिता पाटील, दादासाहेब मगदूम, अशोक होनशेट्टी व संमती रांगोळी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी प. पू. गुरुदेव 108 समंतभद्र महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक डॉ. राकेश तावदारे यांनी केले. विज्ञान प्रदर्शनामध्ये शाळेतील 40 हून अधिक विद्यार्थ्यांनी विविध आधुनिक, प्रायोगिक व नाविन्यपूर्ण विज्ञान मॉडेल्स, प्रयोग आणि चार्ट सादर करून आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे दर्शन घडविले. तसेच रांगोळी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध आकर्षक व विज्ञानविषयक रांगोळ्या साकारल्या.
विज्ञान प्रदर्शन व रांगोळी स्पर्धा पाहण्यासाठी अकोळ गावातील प्राथमिक शाळेचे विद्यार्थीही उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध मॉडेल्स व रांगोळ्यांचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी महावीर पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना विज्ञान प्रदर्शनातील सादरीकरण अतिशय उत्कृष्ट असल्याचे सांगितले. रांगोळीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विज्ञानातील विविध संकल्पना व आकृत्या प्रभावीपणे साकारल्या असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे विज्ञान कौशल्य, ज्ञान, सर्जनशीलता आणि अभ्यासाची आवड वाढण्यास मदत होते, असे त्यांनी नमूद केले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बक्षिसे जाहीर करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या अनिता पाटील यांनी शाळेच्या प्रगतीसाठी संस्थेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व्यवस्थापन सदैव प्रयत्नशील राहील, असे त्यांनी सांगितले. प. पू. गुरुदेव समंतभद्र महाराज यांच्या विचारांनुसार विद्यालयाची वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी प. पू. गुरुदेव 108 श्री समंतभद्र महाराज यांच्या सात्त्विक विचार, आचार व गुणांचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी अंगीकार करावा, असे आवाहन केले. महाराजांनी घालून दिलेली गुरुकुल पंचसूत्री — शील, ज्ञान, प्रेम, व्यवस्था व सेवा ही मूल्ये विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आत्मसात करावीत, असा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. बी. कळंत्रे यांनी केले. यावेळी टी. ए. घोसरवाडे, एस. डी. खोत, यू. पी. पाटील, डी. ए. देसाई, एस. एस. मगदूम तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. एस. डी. खोत यांनी आभार मानले.