पवना शिक्षण संकुलाचा ‘शिक्षक आपल्या दारी’ उपक्रम
शिक्षकांचे वाड्या वस्त्यांवर जाऊन ज्ञानदानाचे कार्य
पवनानगर : कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे गेल्या दिड वर्षा पासून शाळा बंद असून आॕनलाईन शिक्षण सुरु आहे. सर्वच विद्यार्थी या आॕनलाईन प्रवाहात नसल्याने नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या पवनानगर येथील पवना शिक्षण संकुलाच्या वतीने एक नाविन्य पूर्ण उपक्रम ‘शिक्षक आपल्या दारी ‘ राबवत असून पवनमावळातील धालेवाडी,मालेवाडी सारख्या दुर्गम भागात शिक्षक विद्यार्थ्यांच्या गावात जाऊन ज्ञानदानाचे कार्य सुरु करत आहेत.
कोरोनामुळे विद्यार्थी व शिक्षक भेटू शकत नव्हते गेल्या एक वर्षा पासून आॕनलाईन शाळा चालू होती. परंतु आता आॕनलाईन तासाचा देखील मुलांना कटाळा येत असून त्यातच पवनानगर हा भाग ग्रामीण भाग असल्याने नेटवर्कची समस्या त्यातच काही पालकांची बेताची परिस्थिती मुलं देखील मालेवाडी,धालेवाडी अशा डोंगराच्या पायथ्याशी असल्याने अनेक मुलांचा शाळेशी संबध तुटला होता.
नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांच्या लक्षात ही बाब आल्याने विद्यार्थी शाळेत येऊ शकत नाही.परंतु शिक्षक त्यांच्या घरी जाऊन त्यांना शिकवू शकतो. या संकल्पनेतून व पवना विद्यालयातील शिक्षकांच्या सहकार्याने
इयत्ता ५ वी ते ८ वी शिकविणारे शिक्षक शाळेच्या परिसरातील गावात तसेच दुर्गम असणा-या वाड्या, वस्त्यांवर जाऊन मंदिर व मोकळ्या जागेत कोरानाचे नियम पाळत विद्यार्थांना एकत्र करत ‘शिक्षक आपल्या दारी’ उपक्रमाची सुरवात करत विद्यार्थांना शिक्षणाचे धडे देण्यास सुरवात केली आहे.
त्यांच्या या स्तुतीपूर्ण उपक्रमामुळे शिक्षक आपल्या गावात आपल्याला शिकवण्यासाठी आले आहेत हे पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून येत होता.तसेच संस्थेची व शिक्षकांची आपल्या विद्यार्थ्यांंनी शिक्षणापासून वंचित राहु नये यासाठी करत असलेली धडपड पाहून पालक देखील या उपक्रमाचे कौतुक करत आहेत.
संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पवना शिक्षण संकुलाच्या प्राचार्या अंजली दौंडे व पर्यवेक्षिका निला केसकर,शिक्षक सुनिल बोरुडे,राजकुमार वरघडे,भारत काळे,गणेश ठोंबरे,महादेव ढाकणे,बापुसाहेब पवार,संजय हुलावळे ,रोशनी मराडे,वैशाली वराडे,मंजुषा गुर्जर,छाया कर्डिले, सुवर्णा काळडोके,पल्लवी दुश्मन,सुनिता कळमकर,ज्योती कोंढभर,अमोल जाधव,सारिका केंद्रे,गणेश साठे, चैत्राली ठाकर,कांचन तिकोणे ,संतोष ठाकर,सुप्रिया साठे,पुनम दुश्मन,स्वाती आडिवळे व कर्मचा-यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे हा उपक्रम यशस्वी होण्यास मदत होत आहे.
यावेळी बोलताना संस्थेचे सचिव संतोष खांडगे म्हणाले की, कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद आहे. त्यामुळे त्यांचे फार मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यासाठी हा उपक्रम संस्थेने हाती घेतला आहे.ग्रामीण भागातील पवना शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना वाड्यावस्त्यावर जाऊन ज्ञानदानाचे काम करत आहे. हा प्रयोग संस्थेतील इतर शाळेत राबविण्यात येणार आहे.