कागल ची निवडणूक गटाची की पक्षाची?
मतदारांसह नेत्यांनाही पडला यक्षप्रश्न!
निपाणी नगरी प्रतिनिधी (19)
महाराष्ट्र विधानसभेची रणधुमाळी प्रत्यक्षात चालू होण्यास थोडा अवधी असला तरी महाराष्ट्र कर्नाटक सीमेलगत असलेल्या कागल विधानसभा मतदारसंघ मात्र कमालीचा तापला असून मतदारांसह नेत्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली असून या वेळेची निवडणूक एका वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचली आहे. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
कारण मागील झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतील पक्षीय बलाबल पाहिल्यास आत्ता बरेच पुलाखालून पाणी गेले असून आता ही निवडणूक एका पक्षाची किंवा नेत्याची राहिलेली नाहीच तसेच ती आत्ता गटाची का पक्षाची होणार हा देखील मतदारांसह नेत्यांना प्रश्न पडला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बंडानंतर महाराष्ट्रातील अनेक पक्षांमध्ये व नेत्यांमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बंडाळी माजली होती. याचा फायदा अनेकांनी घेतला व अनेकांना त्याचा अप्रत्यक्ष तोटा देखील झाला. कागल मधील नेत्यांचा विचार केल्यास मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने देखील शरद पवार गटातून फारकत घेत आपला सावता सुभा मांडल्यामुळे अजित पवार गटातील वजनदार व पंचवीस वर्षे राजकारणातील श्रावण बाळ माननीय मंत्री हसन मुश्रीफ देखील अजित पवार गटामध्ये सामील होत शरद पवार गटाला खो दिला होता.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने व अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाने भाजपसोबत हात मिळवणी करत सत्ता स्थापन केल्यामुळे कात्रीत सापडलेल्या शाहू साखर कारखान्याचे सर्वेसर्वा राजे समरजीत सिंह घाटगे यांची मोठीच गोची झाली होती. मग त्यांनी देखील वेळीच सावध होत तुतारी हातात घेतल्यामुळे शरद पवार गटाला देखील कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. तर अँड वीरेंद्र मंडलिक यांच्या म्हणण्यानुसार लोकसभेमध्ये मुश्रीफ गटाने केलेली त्यांच्या गटाची व पक्षाची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष गोची व आता संजय मंडलिक व संजय घाटगे यांनी केलेली मुश्रीफ गटाला प्रत्यक्ष मदत सर्वसाधारण मतदार राजाला मात्र संभ्रमात टाकत आहे. पण हेच खरं राजकारण कागल मतदारसंघात पाहायला मिळणार असून सर्वसामान्य नागरिकांसह नेत्यांना देखील होणारी निवडणूक गटाची होणार की पक्षाची होणार या संभ्रमातच येणारा काही काळ जावा लागेल. एवढं नक्की!