प्रवासी व मालवाहतूक करणा-या वाहनांमागे मान्यताप्राप्त कंपनीने रिफ्टेक्टर्स बसविणे बंधनकारक…परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे
आवाज न्यूज :
माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार दुचाकींसह सर्व प्रकारच्या प्रवासी व मालवाहतूक करणा-या वाहनांमागे मान्यताप्राप्त कंपनींचे प्रतिबिंबित करणारे परावर्तक (रिफ्लेक्टर्स) बसविणे बंधनकारक आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.
मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे दाखल रिट याचिकेच्या निर्णयानुसार देशातील रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी रस्ते सुरक्षा समितीची स्थापना केली असून, या समितीने रस्ते अपघात आणि त्यामध्ये होणा-या मृत्यूमध्ये दरवर्षी दहा टक्के घट करणेबाबत निर्देश दिले आहेत. रात्रीच्या वेळी होणारे रस्ते अपघात हे मुख्यत: रस्त्यांवर उभे असलेल्या तसेच कमी वेगाने चालणा-या जड वाहनांची दृष्यमानता कमी असल्यास अशा वाहनांवर अन्य वाहने आदळून धडकतात. रात्री प्रवास करणारी वाहने ही प्रामुख्याने जड मालवाहतूक वाहने असल्याने त्यांची दृष्यमानता वाढविण्यासाठी त्यावर मान्यताप्राप्त कंपनींचे परावर्तक (रिफ्लेक्टर्स), रिफ्लेटिव्ह टेप्स आणि मागील बाजूस रियर मार्किंग प्लेट / टेप बसविणे अनिवार्य असून त्याबाबत केंद्र सरकारने केंद्रिय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 104 ते 104 – ई मध्ये वेळोवेळी सुधारणा केली आहे.