कामशेत मध्ये ग्रामसुरक्षा दलाकडून रात्री गस्त
कामशेत : कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. कामशेत पोलीस ठाण्यांतर्गत सर्व गावांमध्ये रात्रीची गस्त घातली जाते. एकाच वेळी कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या गावांमध्ये गस्त घालणे अपुऱ्या मनुष्यबळामुळे शक्य होत नाही. त्यामुळे कामशेत पोलिसांनी ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करून हद्दीतील सुमारे ४२ गावांमध्ये रात्री गस्त घातली जाते.
कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत बहुतांश दुर्गम भाग आहे. त्यात कामशेत पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे एकाच वेळी अनेक ठिकाणी गस्त घालणे कठीण पडत आहे. दुर्गम भाग असल्याने चोरटे रात्री अंधाराचा फायदा घेऊन अनेक ठिकाणी डल्ला मारून पळून जातात. कामशेत शहरात अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन रात्री उशिरापर्यंत फिरत असणाऱ्या मालवाहतूक गाड्यांना थांबवून त्यातील व्यक्तींना लुटून पसार झाल्याच्या घटनाही घडल्या असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
चोरी, दरोड्याचा घटना रोखण्यासाठी सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्या मार्गदर्शनाखाली कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्याचा निर्णय घेतला. याअंतर्गत सुमारे ४२ गावातील जवळपास दोन हजार तरुणांची निवड करून गस्तीवर ठेवले जाते. यासाठी पोलिसांचे मार्गदर्शन त्यांना असते.