पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांच्या फांद्या तोडल्याचा प्रशासनाचा दावा फोल?
तळेगाव दाभाडे : नगरपरिषद हद्दीतील झाडांच्या धोकादायक फांद्या पावसाळ्यापूर्वी झाटल्याचा नगरपरिषद प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे.
काल दि.२१ जुलै रोजी रात्री सव्वा एकच्या सुमारास जोरदार बरसणाऱ्या पावसा दरम्यान नाना भालेराव कॉलनीतील राधाकृष्ण मंदिराजवळील, अमृतानंद बिल्डिंग समोर निलगिरीच्या झाडाची मोठी फांदी तुटून पडल्याने चार चाकी गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. तर वीज वाहक तारा तुटल्याने परिसरातील वीज पुरवठा बंद झाला आहे.
गाडीवर फांदी पडल्याने झालेल्या मोठ्या आवाजामुळे जाग आलेल्या नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयात याबाबत कळविल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत सदर भागातील वीज पुरवठा खंडित केल्याने पुढील अनर्थ टळला. नेहमीच वर्दळ असणाऱ्या या रस्त्यावर रात्रीच्या वेळेस फांदी पडल्याने कोणालाही इजा झालेली नाही. मात्र रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
नाना भालेराव कॉलनी भागात पन्नास वर्ष जूनी अनेक निलगिरीची झाडे असून त्यांच्या बहुतेक फांद्या धोकादायक झालेल्या आहेत. त्या संदर्भात नागरिकांनी वेळोवेळी नगरपरिषदेत अर्ज केले आहेत. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही, अशी खंत नुकसानग्रस्त गाडीचे मालक अरविंद चव्हाण यांनी व्यक्त केली.
कालच्या पावसात शहरात चार पाच ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे नगर परिषदेमार्फत करण्यात आलेला दावा फोल ठरला आहे.