जेष्ठ आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे निधन
कार्ला : जेष्ठ आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या आठवड्यात प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात पत्नी वीणा, मुलगा सुनिल, संजय आणि स्नूषा व नातवंडे असा परिवार आहे. मंगळवारी संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बालाजी तांबे हे आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ तसेच पुणे जिल्ह्यातील कार्ला येथे असलेल्या आत्मसंतुलन व्हिलेजचे संस्थापक होते. बालाजी तांबे यांना लहानपणापासूनच वडिलांकडून आयुर्वेदाची शिकवण मिळाली होती. त्यांनी आयुर्वेदातली आणि अभियांत्रिकीमधली पदवी एकाच वर्षी मिळवली होती. तर आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यांवर संशोधन केलं होतं.
त्यांच्या गर्भसंस्कारावरील पुस्तकांना मोठी मागणी होती. इंग्रजीसह सहा भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर झालं आहे. केवळ महाराष्ट्रात नाही तर देश-विदेशात त्यांच्या आयुर्वेद उपचारांना मागणी होती.