आंबी पुलाच्या रखडलेल्या कामामुळे नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल
तळेगाव : तळेगाव शहर व एमआयडीसी यांना जोडणारा इंद्रायणी नदीवरील आंबी पूल डिसेंबर 2019 मध्ये तुटला. त्यानंतर त्याचे काम काही महिन्यांनी सुरू करण्यात आले. कोरोना काळात हे काम बंद होते.त्यानंतर पुन्हा काम सुरू झाले. परंतु हे काम पुन्हा बंद झाल्यामुळे इथल्या रहिवाशांना व्यावसायिकांना व विद्यार्थ्यांना खूप मोठा वळसा घालून तळेगाव शहरात यावे लागत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले असून विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.
नाणोली,आंबी या गावातील विद्यार्थी वराळे गावात या पुलावरून शिक्षणासाठी जात असत. कोरोनामुळे बंद असणाऱ्या शाळा पुन्हा सुरू झाल्याने विद्यार्थी 9 किलोमीटर अंतर कापून शाळेत जात आहेत. विद्यार्थ्यांना दोन किलोमीटर अंतरासाठी वळसा घालून शाळेत जाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. व्यवसायिक व कामगार वर्ग ही यामुळे त्रस्त आहे
नवलाख उंब्रे, निगडे, आंबी या भागातील दुग्ध व्यावसायिक,भाजीविक्रेते, शाळकरी मुले हे सर्व या पुलावरून वाहतूक करत असत. परंतु गेल्या दीड ते दोन वर्षापासून हा पूल बंद असल्याने या सर्वांना एमआययडीसी रोडने जीव धोक्यात घालून प्रवास करत तळेगाव शहरात यावे लागते. तरी या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत.