मला बदल हवाय” ही संकल्पना प्रत्येकाने अंगीकारली तर, समृद्धीच्या शिखरापासून कोणी रोखू शकणार नाही : श्याम सिंग,कार प्लॉट हेड टाटा मोटर्स
चिंचवड : क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया पुणे शाखेच्या वतीने 36 वे चॅप्टर कन्व्हेन्शन पार पडले. त्यात अहमदाबाद, बेलगम, कागल, नाशिक, मुरबाड, रांजणगाव, बारामती, पुणे, सांगली, जेजुरी, पिंपरी चिंचवड, परिसरातील टाटा ग्रुप, मिंडा ग्रुप, जेसीबी ग्रुप, किर्लोस्कर ग्रुप, आनंद ग्रुप, भारत इलेक्ट्रॉनिक्स आदी ५१ उद्योग समूहातील १७४ संघातून एकूण ७३० जणांनी सहभाग नोंदवित दिवसभरात 140 संघांनी औद्योगिक समूहात जनजागृती निर्माण होण्यासाठी गुणवत्तेविषयी प्रबंध सादरीकरण केले.
त्यात १९ पोस्टर ०६ श्लॊगण तीन स्पर्धकांनी कविता स्पर्धेत सहभाग घेतला. दिवसभरात दोन सत्रात झालेल्या स्पर्धेत परीक्षण व्यंकटेश पेद्दी, श्यामकांत दिक्षित, हनुमंत बनकर, नरेंद्र रुमाले, रंजीत जाधव, विनय पाटील, सिद्धार्थ धर यांनी केले.
पारितोषिक वितरण समारंभ जेसीबी इंडिया उद्योग समूहातील ऑपरेशन हेड अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते विजेते संघाना व वैयक्तिक विजेत्यांना सुवर्ण व रजक पदक स्मृतिचिन्ह स्वरुपात देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी फोरमच्या विजया रुमाले, ललिता परदेशी, भूपेश माल यांनी विजेत्यांचे वाचन केले.
पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी अतुल कुलकर्णी म्हणाले, क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया देशभरात गुणवत्ता विषयक चळवळ राबवीत आहे. उद्योग समूहाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन केले.
सकाळच्या सत्रात टाटा मोटर्स कार प्लान्टचे हेड श्याम सिंग यांच्याहस्ते स्पर्धेचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून करण्यात आले. फोरमचे रावसाहेब सूर्यवंशी यांनी श्री सिंग यांना स्मृतिचिन्ह देवून सन्मान केला. तर, पारितोषिक वितरण समारंभात जेसीबी इंडिया कंपनीचे ऑपरेशन हेड अतुल कुलकर्णी यांचा भूपेश माल यांच्याहस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
सकाळच्या उद्घाटन सत्रात टाटा मोटर्सच्या कंपनीने कार प्लांट हेड शाम सिंग मार्गदर्शन करताना म्हणाले, दुसऱ्या महायुद्धात जपान देश बेचिराग झाला. जपान देशाचा संपूर्ण पराभव होऊन देखील जपानच्या नागरिकांना पराभव कधीच मान्य केला नाही. तेथील नागरिकांनी कायझेन, पोका योके, कानबान आदी तंत्रज्ञान शोधून देशातील नागरिकांना प्रशिक्षित केले. त्याच्या जोरावर जागतिक बाजारपेठेत जपान या छोट्याशा देशाचे नाव वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवले. त्यानंतर कोरिया, चीन देशांनी देखील जपानची प्रेरणा घेत उद्योग विश्वात आपण वेगळा ठसा निर्माण केला. आता आपल्या भारताची वेळ आली आहे. उद्योजकांच्या गरजा, सरकारी धोरणे व परस्परात ताळमेळ असेल तर, आपल्या देशाला विकासापासून कोणीच रोखू शकणार नाही. उत्पादनातील नाविन्य, उत्पादनाची गुणवत्ता त्याचबरोबर उत्पादनाचा स्पर्धात्मक किंमत या सगळ्या गोष्टी एकाचवेळी साध्य करत तुम्ही स्वतः कुशल होऊन तुमच्या सहकार्यांना देखील कुशल बनवा. चांगल्या गोष्टीचे अनुकरण करा. तसे झाले तरच, भारत देश महान देश बनेल, प्रत्येकजण शिक्षण गुणवत्तेचा पाया आहे हे लक्षात ठेवा. गुणवत्ता हे आदर्श जीवनाचे अविभाज्य अंग आहे. उत्पादनाची पद्धत व सेवा यात सातत्याने सुधारणा करीत राहिले. तर, भारत देश जागतिक बाजारपेठेत अग्रेसर राहून समृद्धीच्या शिखरावर असेल अशा शब्दात उपस्थित स्पर्धकावर प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले.
यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या भोसरी विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार म्हणाल्या, येथील क्वालिटी सर्कल एक्सलन्स सेंटरच्या संचालकांनी कोरोना प्रादुर्भाव काळात महापालिकेला सेंटर उपलब्ध करून दिले. त्याबद्दल विशेष आभार मानले, त्यांचा टाटा मोटर्सचे प्लांट हेड श्याम सिंग यांच्याहस्ते कोविड योद्धा म्हणून विशेष सत्कार केला.
प्रास्ताविकात अनंत क्षीरसागर म्हणाले, आजच्या स्पर्धा शासनाच्या नियमानुसार पार पडत असून सदर स्पर्धा क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सतीश काळोखे व पुणे शाखेच्या अध्यक्षा डॉ. रजनी इंदुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धेचे नियोजन फोरमचे चंद्रशेखर रुमाले व प्रशांत बोराटे यांनी केले.