अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या मच्छीमारांना लवकरात लवकर मदत वाटप करा – महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समितीची निवेदनाव्दारे मागणी
कोल्हापूर : येथे झालेल्या प्रचंड अतिवृष्टी व महापुरामुळे संपूर्ण जिल्ह्याचे अपरिमित नुकसान झाले आहे.या महापूरात व अतिवृष्टीने बाधित मच्छीमार लोकांसाठी 9 कोटी 63 लाख निधीची तरतूद करण्यात आली. मात्र अद्याप या निधीचे वाटप करण्यात आलेले नाही.तरी लवकरात लवकर मदतीचे वाटप करावे अशी मागणी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य मच्छीमार कृती समितीने कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे केली आहे.
हा निधी वाटप करताना शासनाने जाळी खरेदीच्या जीएसटी बिलाच्या पावत्या सादर करण्यासारख्या काही जाचक अटींची पूर्तता मच्छीमारांकडून होत नसल्याने सदर रकमेपैकी आज अखेर एक रुपयाही खर्च झालेला नाही आणि मच्छीमारांना जाळी खरेदी करताना जीएसटी अकाउंट असलेल्या व्यापाऱ्यांकडून खरेदी करायची असते हेही माहीत नाही. तसेच व्यापाऱ्यांकडून जीएसटी च्या खरेदी पावत्या नेहमी दिल्या जात नाही. त्यामुळे जिल्ह्यातील गरीब विनाकारण भरडला जात आहे असे निवेदनात म्हटले आहे.
या प्रकरणात लक्ष घालून जीएसटीची अट शिथिल करून मच्छीमारांना न्याय द्यावा व मदतीचे वाटप लवकर सुरू करण्यास संबंधित विभागाला आदेश द्यावेत अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी ज्योती प्रकाश चाचे (महिला उपाध्यक्ष महाराष्ट्र) दत्तराज शिंदे (कोल्हापूर जिल्हाध्यक्ष), आंबाजी पाटील (जिल्हा उपाध्यक्ष), विनोद गोणे (सचिव), आशोक बागडी (कार्याध्यक्ष), तसेच कोल्हापूर जिल्हा संघाचे संस्थापक गजानन भोई , प्रकाश चाचे ,साईसमर्थ मच्छीमार सह संस्था चेअरमन राजेंद्र शितोळेसरकार, भावेश्वरी संस्थेच्या वतीने उपस्थित होते.