ताज्या घडामोडी

जगदगुरू संत तुकाराम महाराजांची पालखी २० जूनला पंढरीकडे प्रस्थान

    • पिंपरीचिंचवड: वारकरी सांप्रदाय ज्याची आस लावून होता, त्या आषाढी वारीची घोषणा आज करण्यात आली आहे. जगदगुरू संत तुकाराम महाराजांची पालखी २० जूनला पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. पायी प्रवास पूर्ण करून पालखी ९ जुलैला पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे. तर १० जुलैला आषाढी एकादशी साजरी होणार आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही आळंदी या ठिकाणाहून २१ जूनला प्रस्थान करण्यात येणार आहे. गेल्या २ वर्षे कोरोनामुळे पायी वारी बंद करण्यात आली होती. आता आषाढी वारीची घोषणा झाल्याने वारकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण आहे. शेकडो वर्षांपासून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अखंडितपणे पार पडत आहे. या पालखी सोहळ्याची घोषणा आज करण्यात आली आहे.                                                                  यंदा हा पालखी सोहळा देहूतून २० जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहेत. कोरोना संसर्ग ओसरल्याने सध्या सर्व निर्बंध शिथिल करण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत हा सोहळा पार पडणार असल्याने वारकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे. पालखी प्रस्थानाची तारीख जाहीर झाल्याने वारकरी वारीच्या तयारीला आता लागणार आहेत. कोरोनाने गेल्या २ वर्षे वारकऱ्यांना पायी वारीत सहभागी होता आले नाही. त्यांच्या पायी वारीमध्ये खंड पडला होता.
      मात्र, परंपरेत खंड न पडू देता मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा झाला. २ वर्षाचा कठीण काळ लोटल्यानंतर यंदा मोठ्या थाटामाटात ही आषाढी वारी साजरी करण्यासाठी वारकरी मोठ्या प्रमाणात उत्सुक झाले आहेत. गावागावात वारकऱ्यांकडून तयारी सुरू झाली आहे. आता या सर्वांना संत तुकोबा आणि संत ज्ञानोबांच्या पालखी प्रस्थानाची आणि पायी विठोबाच्या चरणी माथा टेकविण्याची आस लागली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!