राज्यातील देवस्थान कमिट्यांवर गुरव समाजाला प्रतिनिधीत्व द्या…..प्रताप गुरव
पिंपरी :- राज्यातील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, पंढरपूर विठ्ठल रखुमाई देवस्थान समिती आणि शिर्डी साईबाबा देवस्थान समितीवर गुरव समाजाला प्रतिनिधीत्व द्यावे. अशी मागणी राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रताप गुरव यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कार्यक्षेत्रात, कोल्हापूर, सांगली, सिंधदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 3500 मंदिरे येतात, यातील बहुतांश मंदिरांची पूजा, अर्चा, देखभाल वंशपरंपरेने गुरव समाज करीत आहे. मागील युती सरकारचा कार्यकाल वगळता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीवर आणि पंढरपूर विठ्ठल रखुमाई मंदिर समितीमध्ये गुरव समाजाला प्रतिनिधित्व मिळाले होते. याही वेळी या तीनही देवस्थान समितीवर गुरव समाजाचा एक प्रतिनिधी घ्यावा अशी आग्रही मागणी गुरव समाजाची आहे.
महाराष्ट्रात 35 लाखांहुन जास्त बलूतेदार गुरव समाजाची लोकसंख्या आहे. त्यांचा पारंपरिक उदरनिर्वाहाचा मार्ग ‘‘ग्रामदेवतांची पूजा अर्चा, साफसफाई, दिवाबत्ती’’ करणे हा आहे. या मंदिरांची पूजा अर्चा, साफसफाई, दिवाबत्ती करून भाविकांकडून मिळणा-या दक्षिणेतून व बलुतेदार पद्धतीने गावातून मिळणा-या शिधा व वार्षिक पेंडी काडीचे बलुते यातून बलूतेदार गुरव समाजाच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. राज्यात 41000 पेक्षा जास्त मंदिरे आहेत. यामध्ये देवस्थान इनाम जमीन असलेली मंदिरे – 18387 आणि ग्रामदेवतेची इतर मंदिर संख्या – 22623 आहे. “गुरव समाज” हा इसवी सन. 6 व्या, 7 व्या शतकापासून गावगाड्यातील एक बलुतेदार घटक म्हणून गावच्या सेवेपोटी ग्रामदेवतांची, पूजा अर्चा, मंदिर साफसफाई, दिवाबत्ती, अशी सेवा करून “देवासमोर येणाऱ्या किरकोळ दान दक्षिणेवर आणि घरोघरी जाऊन मागीतलेला पीठ-मीठ, कोरडा शिधा व वर्षाकाठी शेतकरी बांधवाकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या बलुत्यावर वर्षानुवर्षे गांवात सुख, शांती, ऐश्वर्य, शांतता नांदावे म्हणून देवतांची मनोभावे पूजा करून गावाचे भले होवो अशी मनोभावे प्रार्थना करून गुरवसमाज जगत असतो.
परंतू बलुतेदारांचे इतर सर्वच दैनंदिन मिळकतीचे व्यवसाय कोरोनामुळे बंद झाल्यामुळे हा समाज दुहेरी संकटात सापडला आहे. अशा दुहेरी आर्थिक अडचणीत सापडलेल्या गावगाड्यातील बलुतेदार गुरव समाजाला महाराष्ट्र शासनाने आर्थिक मदत करावी. हि मागणी देखिल अद्यापही प्रलंबित आहे. या मागणीचाही महाविकास आघाडी सरकारने सहानुभूतीपुर्वक विचार करावा, अशीही मागणी राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रताप गुरव यांनी राज्य सरकारकडे केली आहे.