पुरंदर विमानतळासाठी अद्याप जागा निश्चित झालेली नाही- शरद पवार
पुरंदर :येथील विमानतळासाठी जागेबाबत तांत्रिक अहवाल आलेला नाही. विमानतळाच्या जागेसाठी खेड, चाकणच्या जागेचाही विचार करावा लागेल. तिन्ही ठिकाणच्या जागांची पाहणी करून माहिती जमा करून चाचपणी सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही असे मत शरद पवार यांनी पुरंदर विमानतळ विरोधी संघर्ष समिती समोर मांडले आहे. यामुळे चाकणकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
विमानतळ विरोधी संघर्ष समितीने रविवारी शरद पवार यांची भेट घेऊन पुरंदरमधील जागेचा विमानतळासाठी विचार करू नये अशी विनंती केली आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष गणेश मुळीक, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, संतोष कोलते, उद्धव भगत, शशी भाऊ गायकवाड, हरिदास खेसे, चंद्रकांत दौंडकर, किरण साळुंखे आदी उपस्थित होते.
पुरंदर तालुक्यातील रिसे,पिसे,राजुरी,नायगाव,पांडेश्वर तसेच बारामतीमधील भोंडवे वाडी, चांदगुडेवाडी,आंबी खुर्द या गावांमधील २ हजार ८३२ हेक्टर जागेवर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. या विरोधात परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. विमानतळाला जागा देण्यास पुरंदर तालुक्यातील स्थानिकांकडून तीव्र विरोध दर्शवला जात आहे. याकरिता एका कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे.
या परिसरातील जवळपास ७० ते ८० टक्के क्षेत्र बागायती खाली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपल्या जमिनी विमानतळासाठी द्यायचा नाहीत ही या भागातील शेतकऱ्यांची ठाम भूमिका आहे.