लोणावळा धरणाच्या पाणीपातळीत वाढ ; शहरवासियांनी काळजी घ्यावी टाटा पॉवरचे आवाहन
लोणावळा : धरण परिसरात गेल्या 4 दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळा धरणाच्या पाणीसाठयात वाढ झाली आहे. परिसरात पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास धरणाच्या द्वारविरहीत सांडव्यावरून इंद्रायणी नदीमध्ये पाणी येण्याची शक्यता असल्याने शहरातील नागरिकांनी काळजी घ्यावी असा इशारा टाटा पॉवर कंपनीच्या वतीने धरणप्रमुख बसवराज मुन्नोळी यांनी दिला आहे.
लोणावळा धरण जलाशय पातळी 21 जुलेै रोजी सायंकाळी 5:00 वाजता ६२३.८८ मी. होती. जलाशय साठा ८.८५८ द.ल.घ.मी. (५८.७४%) आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पर्ज्यनाचा कल गेले २ दिवसांपासून जास्त असून 8 तासांत लोणावळा धरणावर ११४ मिमी पावसाची नोंद झालेली आहे.
लोणावळा धरणाचा सांडवा द्वारविरहित अनियंत्रित स्वरूपाचा असून पुढील २-३ दिवस अतिवृष्टी पर्ज्यनाचा कल हवामान विभागाने वर्तविलेला आहे. टाटा कंपनीकडून महत्तम क्षमतेने (८००-८५० Cusecs) पाणी वीजनिर्मितीकरिता खोपोली वीजगृहात वळविण्यात येत असून, धरण जलाशयातील सद्यस्थितीतील सरासरी आवक १६००-१७०० cusecs दराने येत आहे. त्यामुळे धरण जलाशय पातळीमध्ये वाढ होत असून सदरहू कल असाच राहिल्यास लोणावळा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची दाट शक्यता आहे आणि द्वारविरहित सांडव्यावरून अनियंत्रित विसर्ग सुरु होण्याची शक्यता आहे.यामुळे परिसरातील सर्व नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन टाटा पॉवरच्या वतीने करण्यात आले आहे.