अखेर आजोबांना मिळाला निवारा
तळेगाव : माणसाच्या मनातील माणुसकीचा झरा अजूनही आटला नाही. समाजात वावरताना काही माणसे माणुसकीची जाणीव नेहमी जागृत ठेवतात. काही प्रसंगातून माणुसकी अजूनही जिवंत आहे याचा प्रत्यय येतो.
तळेगाव येथील शुभम कॉम्प्लेक्स मध्ये एक आजोबा कित्येक महिन्यांपासून बेवारसपणे राहत होते.येणारे-जाणारे दया दाखवत त्यांना खायला प्यायला देत असत.
तळेगाव लायन्स क्लबच्या माजी अध्यक्षा व झोन चेअरमन प्रमिला वाळुंज यांनी या आजोबांना काल याठिकाणी पाहिले. त्यांची दयनीय अवस्था पाहून त्यांनी तातडीने त्यांना आश्रय मिळावा यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले.
आजोबा कुठून आले? त्यांचे नातेवाईक आहेत की नाही? याची आपुलकीने चौकशी वाळूंज यांनी केली. अहिरवडे येथे असणाऱ्या किनारा वृद्धाश्रमास त्यांनी संपर्क साधला. या वृद्धाश्रमाच्या प्रमुख प्रीती वैद्य त्यांच्या टीम बरोबर येऊन या वयोवृद्ध आजोबांना वृद्धाश्रमात घेऊन गेल्या. यामुळे आजोबांना हक्काचा निवारा मिळाला आहे.