पवनानगर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मावळातील विसापूर किल्ल्याला जीर्णोद्धाराची प्रतीक्षा आहे.
शतकानुशतके दिमाखात उभ्या असलेल्या या किल्ल्याचा काही भाग ढासळून लागला आहे. या भागात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तटबंदीचा काही भाग ढासळला असून इतर दगड सैल झाले आहेत. त्यामुळे ठिक – ठिकाणी किल्ल्याची दुरवस्था झाली आहे.
केंद्रीय पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या लोहगड जवळील विसापूर किल्ल्याकडे खात्याचे दुर्लक्ष होत असल्याने इतिहास अभ्यासक व दुर्ग संवर्धक यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दोन महिन्यांपूर्वी किल्ल्यावरील हनुमान मंदिरामागील मोठा भाग कोसळला. मात्र सुदैवाने त्यावेळी पर्यटक नसल्याने दुर्घटना टळली. परंतु वेळीच किल्ल्याकडे लक्ष न दिल्यास भविष्यात मोठी हानी होऊ शकते. त्यामुळे किल्ल्याचा जीर्णोद्धार करावा अशी मागणी दुर्गप्रेमी करत आहेत.