आपला पक्ष मतांचा नव्हे तर केवळ गर्दीचा पक्ष झाला आहे – रामदास आठवले
राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आठवलेंकडून कार्यकर्त्यांची कानउघडणी
लोणावळा : येथे पार पडलेल्या रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकारिणीत आपला पक्ष हा मतांचा नव्हे तर केवळ गर्दीचा पक्ष झाला आहे.कार्यकर्ते माझ्याकडे येऊन तो फोटो काढतात त्याऐवजी त्यांनी स्थानिक पातळीवर कर्तुत्वाने नेतृत्व वाढवावे अशा शब्दात रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांची कानउघडणी केली.
यावेळी बोलताना आपण आमदार निवडून आणू शकत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. अजूनही आपला हक्काचा मतदारसंघ तयार होत नाही. विधानसभा निवडणुकीत तिकीट कोणाला द्यायचे असा प्रश्न पडतो असे ते म्हणाले.
पक्ष वाढवून बळकट करण्यावर भर द्यायला हवा. सभासद वाढवायला हवेत. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी काम वाढवायला हवे. आपापसात वाद न घालता पक्षाने घेतलेला निर्णय सर्वांनी मान्य करावा. नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी. महाराष्ट्रातील सभासद संख्या वाढवून 1 कोटींवर नेण्यासाठी जिल्ह्यांमध्ये कामाला लागा. पक्षाचे कार्य व आंदोलने वाढवा असा सल्ला आठवले यांनी कार्यकारिणी बैठकीत दिला.