कवियत्री, पत्रकार, गीतकार शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षास प्रारंभ
तळेगाव : गजानना श्री गणराया, गणराज रंगी नाचतो, किलबिल किलबिल पक्षी, काटा रुते कुणाला यांसारख्या अनेक अवीट गोडीच्या गीतांना शब्दबद्ध करणार्या गीतकार, कवी, पत्रकार शांता शेळके यांचे जन्म शताब्दी वर्ष आजपासून सुरु झाले आहे.
शांता शेळके यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1922 रोजी पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे झाला. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय, राजगुरूनगर आणि उच्च माध्यमिक विद्यालय हुजूरपागा (एचएचसीपी हायस्कूल), पुणे येथून पूर्ण केले. त्यांनी पुणे येथील एसपी कॉलेजमधून पदवी संपादन केली. तिने मराठी आणि संस्कृत विषयातील एमए पूर्ण केली आणि मुंबई विद्यापीठात प्रथम क्रमांकाने त्या उत्तीर्ण झाल्या.
आचार्य अत्रे यांच्या नवयुग या साप्ताहिकात शांता शेळके या सहाय्यक संपादक या पदावर रुजू झाल्या. या पदावर त्यांनी ३ वर्ष काम केले. त्यानंतर त्या नागपूर येथे हिस्लोप महाविद्यालयात त्या प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या . तिथे बरीच सेवा केल्यानंतर त्या मुंबई येथील परळ येथे महर्षी दयानंद महाविद्यालयातुन निवृत्त झाल्या. निवृत्तीनंतरचे आपले साहित्यिक जीवन शांता शेळके यांनी पुण्यात व्यतीत केले.
शांता शेळके यांनी कविता, कथा, कादंबरी, चारित्र्य रेखाटन, मुलाखती, समालोचन आणि परिचय या रूपात मराठी साहित्यात योगदान दिले. इंग्रजी सिनेमाचे भाषांतर करण्यासही त्यांनी मदत केली आणि वृत्तपत्रात स्तंभलेखन केले.
शांता ताईंना आपल्या भरीव कामगिरीबद्दल अनेक पुरस्कार ही मिळाले. जसे की गदिमा गीतलेखन पुरस्कार 1996.
सुरसिंगार पुरस्कार (‘मांगे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश’ या गाण्यासाठी)
केंद्र सरकारचा सर्वोत्कृष्ट चित्र पुरस्कार (चित्रपट भुजंग)
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार (2001) यांसारखे अनेक पुरस्कार शांता ताईंना मिळाले
तसेच आळंदी येथे १९९६ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.
त्यांचे जीवनच विविध रंगांनी नटलेले च होते, शांता शेळके या केंद्रीय फिल्म प्रमाण मंडळाच्या, तसेच त्या महाराष्ट्रराज्य नाटक परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्य होत्या. शांताबाईंनी डॉ. वसंत अवसरे या टोपण नावाने देखील गीते लिहिली. साहित्य संस्कृती मंडळाच्या साहित्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शांताबाई शेळके या आपल्या तळेगाव दाभाडे येथे आल्या होत्या. याची आठवण तळेगावातील जाणकार साहित्यप्रेमी रसिक आजही काढतात.
६ जून २००२ रोजी ७९ व्या वर्षी शांता शेळके यांचे निधन झाले. त्या जरी आज हयात नसल्या तरी त्यांच्या अजरामर साहित्य कृतींना आजही रसिकांच्या मनात आपले अढळ स्थान निश्चितच राखून आहेत यात शंकाच नाही.