तळेगावातील रुपी बँकेच्या नियोजनशून्य कारभाराचा खातेदारांना मनस्ताप ; ज्येष्ठ नागरिक त्रस्त
तळेगाव : येथील गाव भागातील रुपी बँकेच्या शाखेसमोर खातेदारांच्या भर उन्हात लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रणरणत्या उन्हात नागरिक खात्यातील रक्कम काढण्यासाठी तासनतास ताटकळत बँके बाहेर उभे आहेत. मात्र बॅंकेच्या ढिसाळ कारभारामुळे खातेदारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे . तर ज्येष्ठ नागरिक यामुळे त्रस्त झाले आहेत.
गेल्या काही वर्षापासून रूपी बँक बंद आहे. खातेदारांचे पैसे गोठविण्यात आले आहेत. खाती गोठवल्यामुळे आता हे पैसे परत मिळवण्यासाठी 15 ऑक्टोबर पर्यंत काही कागदपत्रे जमा करून फॉर्म भरून देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
त्यासाठी मोठ्या प्रमाणात बँकेच्या बाहेर रांग लागली आहे. यात ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. या नागरिकांसाठी कुठलीही सोय बँकेच्या वतीने करण्यात आलेली नाही.
याबाबत खातेदारांनी आपली व्यथा आवाज न्यूजकडे मांडली. यावेळी बोलताना, दुपारी 2:30 वाजता बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्यात येतात ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालू ठेवावेत. वयोवृद्ध लोकांना कर्मचा-यांनी लवकरात लवकर व्यवहारासाठी बँकेत सोडावे. वारंवार हेलपाटे मारायला लागतात तो त्रास कमी व्हावा. बँकेच्या कामकाजात शिस्त असावी अशी मागणी बँकेच्या खातेदारांनी केली आहे.