सध्याच्या काळात ईडी सीबीआयचा राजकीय दृष्टीने वापर – शरद पवार
मुंबई : सध्याच्या काळात ईडी सीबीआय यांचा वापर राजकीय दृष्टीने केला जात असल्याचे चित्र दिसत आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत केली. परमबीर सिंग यांच्यावरही शरसंधान साधताना अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे परमबीर सिंह हे गायब असून त्यांचा अजून पत्ता लागला नाही असे ते म्हणाले.
लखिंपुर खेरी या ठिकाणी जो हिंसाचार झाला तो पूर्वी कधी झाला नव्हता. यामध्ये केंद्रीय मंत्र्याचा मुलगा असल्याने न्यायालयाने दखल घेतल्यानंतर त्याला अटक झाली. यात सत्ताधारी भाजपन भूमिका घ्यायला हवी होती असे त्यांनी नमूद केले.
काही संस्थांचा गैरवापर करण्याची पावले सातत्याने केंद्र सरकारकडून टाकण्यात येत आहेत. सीबीआय इन्कम टॅक्स यासारख्या संस्थांचा वापर राजकीय दृष्टीने केला जात असल्याचे सध्या चित्र दिसत आहे अशी बोचरी टीका त्यांनी केली.
राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर देताना मावळमध्ये शेतकरी मृत्युमुखी पडले. परंतु त्यांच्या मृत्यूला नेते जबाबदार नव्हते. पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी काही पावले उचलली होती असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.