अवजड वाहतुकीमुळे तळेगाव कातवी रस्ता गेला खड्ड्यात ; अपघातांनाही आमंत्रण
तळेगाव : तळेगाव शहर आणि तळेगाव एमआयडीसी यांना जोडणारा इंद्रायणी नदीवरील आंबीचा पूल डिसेंबर 2019 मध्ये पडला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक तळेगाव कातवी ह्या सर्वात जवळच्या मार्गावर वळवण्यात आली. पण सध्या तोच रस्ता नागरिकांच्या अडचणींचे कारण बनला आहे .या रस्त्याची अवजड वाहतुकीमुळे दुरावस्था झाली आहे व अपघातांनाही निमंत्रण मिळत आहे.
यशवंत नगर परिसरातून जाणा-या तळेगाव कातवी रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झालेली आहे. या रस्त्याने जात असताना नागरिकांना खड्ड्यांमधून रस्ता शोधावा लागतो. आधीच अरुंद असलेला तळेगाव रस्ता सततच्या वाहतुकीमुळे सदैव गजबजलेला असतो. तसेच रस्त्यावरील खडी डांबर उखडल्यामुळे रस्त्यातील खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावरील खड्डे चुकवताना अनेकवेळा अपघात झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
तसेच येथील अवजड वाहतकीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. येथील रस्ते प्रचंड चढ – उताराचे असल्याने या रस्त्यावर जाणारी अवजड वाहने उतारावरुन मागे आल्याने अनेक अपघात घडले आहेत.
या संदर्भात नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रार केली आहे. पण यावर अजूनही काहीच तोडगा न काढल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण तयार झाले आहे .तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षांपासून बंद असलेली शाळा आणि महाविद्यालये खुली करण्यात आली आहेत. रस्त्यामधील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये एखाद्या विद्यार्थ्यास किंवा नागरिकास कोणत्याही प्रकारची हानी झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे.