MIDC तील मुख्य रस्ता अंधारात, अपघातांची शक्यता; अधिकाऱ्यांचे मात्र दुर्लक्ष
तळेगाव : तळेगाव एमआयडीसी मुख्य मार्ग अंधारमय झाला असून अपघातांचा धोका वाढला आहे. याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
एमआयडीसीतील मुख्य रस्त्यावरील गेले पाच-सहा दिवसांपासून जलशुद्धीकरण केंद्रापासून साधारण एक किलोमीटर पर्यंतचे लाईट बंद आहेत. त्यामुळे मुख्य रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य आहे येथील सर्व खांबांचा वापर धोकादायक पद्धतीने टाकलेल्या फायबर केबल साठी केला जातो. मात्र दिवे बंद झाले तर तातडीने दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे हे खांब प्रामुख्याने केबल साठीच आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
जलशुद्धीकरण केंद्राच्या चौकात मुख्य रस्त्यावर काही महिन्यांपासून पडलेल्या मोठ्या खड्ड्याच्या ठिकाणी बॅरिकेट्स लावून अडथळा केला आहे. परंतु खड्डा बुजवून दुरुस्ती करण्यात आलेली नाही. तसेच या रस्त्यावर असलेले स्पीड ब्रेकर वरील पांढरे पट्टे नाहीसे झाल्याने स्पीड ब्रेकर दिसत नाही.त्यामुळे रस्त्यावरील खड्डे,असुरक्षित स्पीड ब्रेकर यामुळे लाईट नसलेल्या या मार्गावर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे त्यातच अवजड वाहनांना वाहनतळ नसल्याने रस्त्याच्या कडेला वाहने उभी केली जातात. अंधारात समोर उभे असलेले वाहन लक्षात न आल्यास मोठा अनर्थ घडू शकतो.
रात्रपाळीसाठी ये-जा करणारे कामगार तसेच आसपासच्या गावातील नागरिकांना अंधारातून धोकादायकरित्या प्रवास करावा लागत आहे. त्यात पायी चालणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन फिरावे लागत आहे. अशा अनेक समस्यांचे माहेरघर असलेल्या तळेगाव आंबी एमआयडीसीतील अनेक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे या एमआयडीसीला कोणी वाली आहे का असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.