तीन पक्ष एकत्र येऊनही भाजपचा पराभव करू शकत नाहीत- देवेंद्र फडणवीस
नागपूर: स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या नागपूर प्राधिकार मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री आणि प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांचा दणदणीत विजय झाला. काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांचा त्यांनी १७६ मतांनी पराभव केला. भाजपला ३१८ मतांची अपेक्षा असताना तब्बल ४४ मते बावनकुळे यांना अधिक मिळाली.
भारतीय जनता पक्षाचा विजय हा सुनिश्चित होताच. कारण एकूण ५६० मतदारांपैकी ३१८ मतदार हे भाजपची आहेत.आज जाहीर झालेल्या विधान परिषद निवडणूक निकालांमध्ये नागपूरमधून चंद्रशेखर बावनकुळे आणि अकोला, बुलडाणा, वाशीम मतदारसंघातून भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी बाजी मारली. यावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, बावनकुळे यांचा विजय म्हणजे भविष्यातील भाजपच्या विजयाची नांदी असल्याचे मत प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
या निवडणुकीत नागपूर आणि अकोल्यातील भाजपच्या उमेदवारांना महाविकास आघाडीची मते मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे भविष्यात राज्यात पुन्हा एकदा भाजप सर्वात मोठा पक्ष बनेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी ते पुढे म्हणाले, बावनकुळे आणि खंडेलवाल यांचा झालेला विजय हा निर्णायक असून, तीन पक्ष एकत्र आले तरी ते भाजपचा पराभव करू शकत नाहीत हे यातून सिद्ध झाले आहे. तीन पक्ष एकत्र आल्यावर आम्ही सर्व निवडणुका जिंकू शकतो हा त्यांचा भ्रम आम्ही खोडून काढला आहे.