एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर ; कामगार न्यायालयाचा निर्णय
मुंबई : विलीनीकरणाच्या मागणीसाठी मागील दोन महिन्यापासून संपावर असलेल्या एसटी कर्मचा-यांना आणखी एक दणका बसला आहे.वांद्रे कामगार न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असल्याचा निर्णय दिला आहे.
गावखेड्यात जाणारी एसटी बसची चाक गेल्या दोन महिन्यापासून थांबलेली आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात काही ठिकाणी फूट पडली.त्यामुळे काही कर्मचारी कामावर परतले आहेत. मात्र काही कर्मचारी संपावर ठाम आहेत. या संपाच्या विरोधात एसटी महामंडळाने वांद्रे कामगार न्यायालयात धाव घेतली होती. कामगार न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांचा संप पूर्णपणे बेकायदेशीर ठरवला आहे.
10 जानेवारी रोजी एसटी कामगार संघटनेच्या नेत्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर कामगार संघटनेने संप मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर अनेक आगारात कर्मचारी कामावर परतले.
एसटी ही लोकोपयोगी सेवा आहे. पण संप करण्या आधी किमान सहा आठवडे नोटीस द्यावी लागते. पण कामगारांकडून अशी कोणतीही नोटीस दिली गेली नाही .त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर आहे असा निर्णय वांद्रे कामगार न्यायालयाने दिला आहे.