लिलाव भिशीच्या माध्यमातून इंदापूरमधील अनेकांची फसवणूक, गुन्हा दाखल
इंदापूर : लिलाव भिशीच्या माध्यमातून इंदापूरमधील शेकडो जणांची आतापर्यंत 200 कोटींहून अधिक आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. भिशी चालक अनधिकृतरित्या ही लिलाव भिशी चालवत होते. हातगाडी, टपरी, पथारी, मोलकरीण, भाजी विक्रेते अशा किरकोळ व्यापाऱ्यांपासून मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत या भिशीत सहभाग होता.
छोटी भिशी 5 ते 10 लाखापर्यंत आणि मोठी भिशी 50 लाख ते एक-दोन कोटींपर्यंत भिशीची रक्कम ठरवण्यात आली होती.होतीदापूर शहरातील भिशी प्रकरणात आज अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पाच भिशी चालकांवर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पाच अधिकारी व इंदापूर पोलीस पोलिसांनी भिशी चालकांच्या घरी छापा टाकला. या छाप्यात अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली असून पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, इंदापूर शहराच्या बाजारपेठेतील जवळपास प्रत्येक व्यापारी लिलाव भिशीच्या विळख्यात अडकलेला आहे. एक भिशी चालक किंवा मध्यस्थी हा एका वेळी दहा ते पंधरा पुकार भिशी चालवित असतो. बहुतांश भिशी मध्येच बंद पाडून किंवा बंद पडल्यानंतर असे भिशी चालक अर्ध्यातून भिशी बुडवून फरार झाले आहेत. त्यामुळे यात शेकडो जणांची कोट्यवधीची आर्थिक फसवणूक झाली आहे.