शपथेचा भंग केल्यामुळे मविआचे मंत्रिमंडळ बरखास्त करा – चंद्रकांत पाटील यांची राज्यपालांकडे मागणी
पुणे : अवैध बांधकामाबद्दलचा दंड आणि व्याज माफ करून महाविकास आघाडी सरकारने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना वैयक्तिक लाभ करून दिला आहे व मंत्रिपदाच्या शपथेचा भंग केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे मंत्री मंडळ बरखास्त करावे आणि मंत्र्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडे केली आहे.
यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, प्रदेश उपाध्यक्ष राज पुरोहित, प्रदेश सचिव संदीप लेले, ठाणे शहराध्यक्ष आ. निरंजन डावखरे प्रदेश माध्यम विभाग प्रमुख आ. राहुल नार्वेकर, अॅड.शहाजीराव शिंदे, अॅड.कुलदीप पवार आणि प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते.
राज्यपाल यांना भेटल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले की,सरकार स्थापन करताना मंत्र्यांची पद आणि गोपनीयतेची शपथ घेताना कोणाही एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक लाभ करून देणार नाही अशी शपथ घेतलेली असते.तथापि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी वैयक्तिक लाभ करून देणारा निर्णय घेऊन महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने शपथेचा भंग केला आहे. या प्रकरणी राज्याच्या अर्थ खात्याने अनेक आक्षेप घेतले होते. पण त्याकडे दुर्लक्ष करून मंत्रिमंडळाने निर्णय घेतला. राज्यपालांनी त्यांना शपथ दिली असल्याने त्यांच्याकडे कारवाईची मागणी केली. यानंतर आपण या प्रकरणी लोकायुक्तांकडे दाद मागणार आहोत. तसेच उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करण्यात येईल.