तळेगाव : शेतकऱ्यांचे त्याच्या गोठ्यातील गाय वासरांवर अतोनात प्रेम असते. त्याच्या गोठ्यातील जनावरांचा तो मुलाबाळांना प्रमाणे संभाळ करतो. त्यामुळे या गाई म्हशींच्या बाबत काही विपरीत घडल्यास तो पेटून उठल्याशिवाय राहत नाही असेच काहीसे घडले आहे तळेगावमध्ये.
तळेगाव येथील शेतकरी हसबनीस यांच्या गोठ्यातील 14 म्हशी व 8 पारड्यांचा शेजारी असणा-या कीकॉक्स्टो कंपनीतून होणाऱ्या हवा व पाणी प्रदूषणामुळे तीन वर्षाच्या काळात मृत्यू झाला.
याबाबत शेतकरी हसबनीस यांनी अनेकदा राज्य प्रदूषण मंडळाकडे तक्रार केली. परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही .अखेरीस प्रदूषण मंडळाकडून काही दाद न मिळाल्याने हसबनीस यांनी अॅड.दिप्ती माहुरकर आणि पर्यावरण तज्ञ डॉ. गौरी जोशी यांच्या माध्यमातून राष्ट्रीय हरित लवाद पुणे यांच्याकडे रितसर खटला दाखल केला.कीकॉक्स्टो कंपनीविरोधात हरित लवादाकडे दाद मागितली.
गुरुवारी ( दि. 20 जानेवारी) रोजी राष्ट्रीय हरित लवाद पुणे येथे झालेल्या हसबनीस विरुद्ध किकॉक्स्टो कंपनीच्या खटल्याचा अंतिम सुनावणी मध्ये हरित लवादाने मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील या कंपनीवर कारवाई करत त्यांना आजपर्यंत केलेल्या हवा आणि प्रदूषणामुळे झालेल्या नुकसानापोटी पाच लाख रुपयांचा अंतरिम दंड केला आहे.
यासंदर्भात आवाज न्युजने सर्वप्रथम बातमी प्रसारित केले होती. त्यानंतर सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश लाभले आहे .अखेर शेतकऱ्याला न्याय मिळाला.
न्यायालयाने कंपनीमुळे आजवर या भागावर कार्बन उत्सर्जनामुळे झालेल्या संपूर्ण नुकसानीचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन त्याच्या भरपाई आणि संवर्धनासाठी पुढील तीन महिन्यात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. तसेच हसबनीस यांना त्यांचे अधिक नुकसान झाले असेल तर या संदर्भात योग्य ती पुर्नंमांडणी महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळासमोर करण्यास सांगितले आहे.
न्यायालयाने आपल्या अंतिम निकालात कंपनीच्या वतीने जल (संरक्षण) प्रदूषण कायदा 1974 हवा (संरक्षण )प्रदूषण कायदा 1981 अपायकारक कचरा (व्यवस्थापन) नियम 2008 या कायदेशीर तरतुदींचा भंग झाल्याचे ग्राहय धरले आहे.तसेच प्रदूषण मंडळाच्या कारभारावर ताशेरे देखील ओढले आहेत.
मी दिलेल्या लढ्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळणार असून अन्याय होत असल्यास बलाढ्य कंपनी समोर शेतकऱ्यांनी नतमस्तक होऊ नये असे हसबनीस यांनी आवाज न्यूजशी बोलताना सांगितले.