लोणावळ्यात रविवारी आयआरबी कंपनीच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन
लोणावळा : मुंबई – पुणे राष्ट्रीय महामार्गावर वलवण ते खंडाळा दरम्यान सातत्याने होणाऱ्या अपघातात अनेक निष्पाप नागरिकांचे प्राण जात आहेत. तरी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व आरबीआय हलगर्जीपणा करत आहे. या दोन्ही यंत्रणांकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना होत नसल्याने जागरुक नागरिक येत्या रविवारी (दि.20 फेब्रुवारी रोजी) लोणावळ्यात तीव्र रास्ता रोको आंदोलन करणार आहेत.
रविवारी सकाळी 11 वाजता गवळीवाडा नाका येथील महावीर चौकात आंदोलन होणार असून याबाबतचे निवेदन लोणावळा शहर पोलिसांना देण्यात आले आहे.
मुंबई – पुणे रोडवर लोणावळा परिसरात अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे. वलवण ते खंडाळा परिसरातील विद्यार्थी, युवक, महिला,बंधू-भगिनींना आपला जीव धोक्यात टाकून या रोडवर प्रवास करावा लागतो लोणवळे नागरिकांना या समस्येला सतत सामोरे जावे लागत आहे.
गेल्या अनेक वर्षापासून शासनाकडे हायवेवर लोणावळा परिसरात डिव्हायडर बसवणे,वाहतुकीचे अवघड वाहने एक्सप्रेस हायवेला वळवणे या व अनेक मागण्यांसाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु आश्वासना पलीकडे काहीच होत नाही. त्यामुळे हे ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी जागरुक नागरिक या बॅनरखाली राजकीय पक्षांचे पदाधिकारी, विविध संस्था, व संघटनांचे कार्यकर्ते, नागरिक, विद्यार्थी यांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.