बापरे! रस्ता आहे की चाळण…?
कामशेत : मागील काही महिन्यांपासून मावळ तालुक्यात रस्ता काँक्रीटीकरणाचा घाट घातला जात आहे. मावळ तालुक्यातील अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करून सुशोभित करण्यात येत आहेत. अशातच वडीवळेकर व खांडशीकरमात्र अजूनही “चांगल्या” रस्त्याच्या प्रतिक्षेत आहेत. वडीवळे ते खांडशी रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन गाड्या चालवाव्या लागत आहेत. या मार्गावर नेहमीच दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ पहावयास मिळते.
कामशेत कडून वडीवळे गावाकडे जाताना इंद्रायणी नदीवर पूल लागतो. त्या पुलाची “लाकडं” स्मशानात गेली असून तो कधीही कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता आहे. ह्या पुलाबाबतच्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध होऊनही प्रशासन मात्र थंड आहे. आता ह्या पुलावर एखादी जीवितहानी झाल्यास ह्याला कोण जबाबदार असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारीत आहेत.