राज्य झाले कोरोना निर्बंधमुक्त ; मास्क देखील ऐच्छिक
मुंबई : राज्यात कोरोनाचे निर्बंध काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात महाराष्ट्र निर्बंध मुक्त झाला आहे. याशिवाय मास्कदेखील बंधनकारक नसेल अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत 1 एप्रिलपासून महाराष्ट्रातले सर्व निर्बंध उठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आगामी काळातील सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करता येणार आहेत.
1 एप्रिल ते 8 एप्रिल पर्यंत राज्य सरकारने संचारबंदी लागू केली होती. या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा रामनवमी हे सण कसे साजरे करायचे असा प्रश्न उपस्थित केला जात होता. विरोधकांनी या संदर्भात राज्य सरकारवर सातत्याने टीका केली होती.परंतु सरकारने 1 एप्रिल अर्थात उद्यापासून हे निर्बंध उठवले आहेत. त्यामुळे या निर्णयानंतर हे सण धुमधडाक्यात साजरे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पाडव्याच्या निमित्ताने निघणाऱ्या शोभायात्रा व मिरवणूकांच्या परवानगीबाबत आणि निर्बंध शिथिल करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतील असे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले होते. त्यानंतर आज झालेल्या बैठकीत निर्बंध उठवण्याचा निर्णय घेण्यात आला.