अतिदुर्गम खांडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत राबवला जातोय ‘चिमण्यांसाठी पाणी’ हा उपक्रम
मावळ : आंदर मावळातील शेवटचे टोक असणाऱ्या खांडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सध्या कडाक्याचा उन्हाळा असल्याने चिमण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली जात आहे.दुपारी विद्यार्थ्यांच्या जेवणानंतर ताटे धुवून ताटांमध्ये स्वच्छ पाणी भरुन ती ताटे व्हरांड्यामध्ये ठेवली जात आहेत.परिसरातील तहानलेल्या चिमण्या व्हरांड्यात येऊन ताटांमधील पाणी पिताना दिसत आहेत.त्यामुळे सध्या खांडी शाळेत विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाबरोबरच चिमण्यांचा चिवचिवाटही ऐकू येत आहे.
सध्या उष्णतेची लाट असल्याने आपल्या अंगाची लाहीलाही होत आहे.पक्ष्यांचीही पाणी पिण्यासाठी भटकंती सुरु असलेले सर्वत्र दिसते.त्यामुळे त्यांनाही जीव आहे ही भावना लक्षात घेऊन ‘चिमणीसाठी पाणी’ हा उपक्रम सुरु केल्याचे मत शाळेचे मुख्याध्यापक सुनिल साबळे यांनी व्यक्त केले.चिमण्या पाणी पिताना पाहून अत्यानंद होत असल्याचे मत रुपाली गायकवाड यांनी व्यक्त केले.हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी राहुल राठोड,शिवाजी चौगुले हे शिक्षक प्रयत्नशील आहेत.