१४ विद्या आणि चौसष्ट कलांची देवता असणाऱ्या श्री गणरायाचे आगमन व विसर्जन . डॉक्टर. मिलिंद भोई..
दोन वर्षांच्या विरहानंतर भेटणार, त्याच्या स्वागताची तयारी करता करताच तो आला आणि आपल्या अस्तित्वाने गेल्या 2वर्षांपासून करोना संकटाने त्रासलेल्या ,निराशेने ग्रासलेल्या सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर इतक्या दिवसांनी आनंद दिसला.
१४ विद्या आणि चौसष्ट कलांची देवता असणाऱ्या श्री गणरायाच्या आगमनाची तयारी …….
आवाज न्यूज: पुणे, ११ सप्टेंबर २०२२.
तो येणार, दोन वर्षांच्या विरहानंतर भेटणार, त्याच्या स्वागताची तयारी करता करताच तो आला आणि आपल्या अस्तित्वाने गेल्या 2वर्षांपासून करोना संकटाने त्रासलेल्या ,निराशेने ग्रासलेल्या सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर इतक्या दिवसांनी आनंद दिसला.
हातावर पोट असणाऱ्या सर्वसामान्यांपासून अगदी उद्योगपती श्रीमंतांपर्यंत सर्वांचेच रुतलेले अर्थचक्र या विघ्नहर्ताने सोडवले .2 वर्षातल्या नकारात्मक आणि नैराश्याचे वातावरणात त्याच्या आगमनाने जादूची कांडी फिरल्यासारखे सारखा बदल दिसू लागला .सृजनाची आणि मांगल्याची देवता असणारा बाप्पा येताना खूप सारा आनंद , उत्साह ,प्रसन्नता घेऊन आला .
आम्हाला सर्वांना आपल्या कृपाछत्राखाली सामावून घेतले आणि हा आनंद घेत घेता घेताच त्याच्या परतीचे वेध लागले. जी गोष्ट कधी संपू नये असं वाटतं नेमकी तीच गोष्ट लवकर संपते हे त्याला निरोप देताना जाणवलं. सुख आणि समृध्दी, समाधान घेऊन येणारा बाप्पा जाताना डोळ्यात अश्रू देऊन गेला.
मोकळा मांडव पाहताना आणी हे लिहिताना पण माझ्या सारख्या रस्त्यावर च्या कार्यकर्त्यांचे डोळे भरलेत. सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे ज्याला आपण जीव लावतो त्याच्या पासुन दूर जाणे.
संगीत सम्राट प्यारेलाल यांचे गाणे आहे, …..लंबी…जुदाई………हे ऐकल्यावर प्रत्येक संवेदनशील माणसाच्या डोळ्यात पाणी येतं. तसंच काहीसं माझं आज झालंय.
ज्याची सुरुवात असते त्याचा शेवट पण असतो हा निसर्गाचा नियम आहे .उत्पत्ती, स्थिती,लय हे नियती चं चक्र आहे.
पण त्याचं येणं आणि जाणं ही फक्त संकल्पना आहे. तो यायला आणि जायला आपल्यासारख्या सर्वसामान्य नाही ..कारण तो प्रत्यक्ष ब्रह्म स्वरूप आहे. *त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासी, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसी* असे त्याचे वर्णन आहे. तो बाप्पा आहे पण अंधश्रद्धेला न मानणारा बाप्पा आहे. कलेच्या आणि बुद्धीच्या सोबतच ती ज्ञानाची आणि विज्ञानाची पण देवता आहे .हे त्याचं वेगळेपण मला भावतं आणि कदाचित म्हणूनच त्याला अग्र पूजेचा मान मिळाला असावा.
*देवा तुची गणेशु, सकलमती प्रकाशु, म्हणे निवृत्ती दासू,अवधारी जो जे* …..असं म्हणून आपल्या वाग्यज्ञाची सुरुवात करताना साक्षात माऊलींना सुद्धा *ओम नमोजी आद्या*….असं म्हणावं लागलं.
खरं तर त्याचं येणं आणि जाणं हे प्रतीकात्मक आहे कारण तो सदैव तुमच्या आमच्या बरोबर आहे. विघ्नहर्ताच्या रूप घेऊन तो डॉक्टरांमध्ये आहे, तसंच स्वता च्या घरातला बाप्पा बाजूला ठेवुन, स्वत:च्या लेकरांना कधीच गणपती न दाखवू शकणार्या , हातात काठी घेऊन रस्त्यावर ऊभा राहून लोकांच्या रोषाला तोंड देणाऱ्या पोलिसांमध्ये आहे, रात्रभर जागून लेखणी ची सेवा करणार्या कर्मयोगी पत्रकारांमध्ये आहे, सामान्यांचे आरोग्य राखण्यासाठी धडपडणार्या सफाई सेवकांमध्ये आहे,
त्यांच्या साठी रात्रंदिवस एक करणार्या आणी घरच्यांची बोलणी ऐकणार्या मंडळाच्या कार्यकर्त्यां मधे आहे ,ढोल, बँड, सनई आणी चौघडे वाजवणार्या कलाकारांमध्ये आहे. नदीपात्रात अहोरात्र थांबून स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे जीव वाचवणार्या जीव रक्षाकांमध्ये आहे ,रात्रभर जागून वाहने चालवणाऱ्या ट्रॅक्टर आणि ट्रक च्या ड्रायव्हर मध्ये आहे. त्याच्या आगमनासाठी अहोरात्र जागणाऱ्या असंख्य कलाकारांमध्ये,लाईट वाल्यां मधे, कामगारांमध्ये ,मांडव उभारणाऱ्यांमध्ये आहे , त्याच्या साठी झटणाऱ्या अनेक अनामिकां मधे आणि त्याच्या दर्शनासाठी गर्दीत तासंतास थांबणाऱ्या गणेश भक्तांमध्ये सुद्धा आहे.
म्हणूनच त्याला मूर्ती रूपात पाहण्याबरोबरच या सर्वांमध्ये पण पाहणं आवश्यक आहे असं मला वाटते. या सर्वांच्या रूपाने तो सतत आपल्या सोबत राहून आपली विघ्ने दूर करतो आणि त्याचं विघ्नहर्ता हे नाव सार्थ करतो.
त्याला निरोप देताना एकच विनंती, तुझ्या भक्तांवर तुझा कृपाशीर्वाद असाच असू दे. जाताना दुःख ,दैन्य अमंगळ सोबत घेऊन जा….. जीवाच्या आकांताने तुझी वाट बघणार्या भक्तांसाठी पुढच्या वर्षी लवकर ये . आम्ही तुझी वाट बघतोय……..
अगदी मन्ना डे यांच्या स्वरात……..पुछो ना कैसे मैने रैन बितायी…….एक पल जैसे…..एक युग बिता………युग…..बिते……..मोहे……निंद….ना…..आयी……….🙏
तुझाच कार्यकर्ता
© डाॅ. मिलिंद भोई.