गढूळ व कमी दाबाच्या पाण्याने रहिवासी हैराण
चिंचवड : गेल्याही दिवसांपासून पारीजातबन, सुदर्शनगर परिसरात उशिरा संध्याकाळी पिण्याचे पाणी करंगळीपेक्षा बारीक येत असून त्यात गढूळ पिण्याचे पाणी येत असल्यामुळे रहिवासी हैराण झाले आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक व गरोदर स्त्रियांना तिसर्या व चौथ्या मजल्यावर पिण्याचे पाणी कसे घेवून जायचे हा प्रश्न त्यांना उदभवला आहे. अनेकवेळेला विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे भुमिगत पाण्याच्या टाकीतून गृहसंकुलावरील पाण्याच्या टाकीत विद्युत पंपाद्वारे पाणी पोहचत नसल्यामुळे अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. गृहसंकुलांना जलवाहिनी मोठ्या आकाराच्या पालिकेच्या वतीने पाहणीकरून बसण्यात याव्यात, अशी नागरीकांची मागणी आहे.
पारीजातबन, सुदर्शनगर परिसरात अनेक शेकडो कुटूंबीय 1966 पासून वास्तव्य करीत आहे. अनेक गृहसंकुलात पिण्याच्या पाण्याची नलिका सोसायटी आवारातील बांधण्यात आलेल्या भुमिगत सिमेंटच्या टाकीत पिण्याचे पाणी पालिकेच्या जलवाहिनीद्वारे सध्या दिवसाआड येते. तेच पाणी गृहसंकुलातील नागरिकांच्या वतीने विद्युत पंपाच्या माध्यमातून गृहसंकुलावरील टाकीत सोडले जाते. तेथून गृहसंकुलातील रहिवासीयांना बंद नलिकेतून पाण्याचा पुरवठा होतो. काही गृहसंकुलाच्या तळमजल्यावर नळाची व्यवस्था केली असून अनेक रहिवासी तेथून कळशी, हंडा, बादलीत पाणी भरून पिण्यासाठी घरोघरी वापरतात.
गढूळ पिण्याच्या पाण्यामुळे साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पालिका आयुक्तांनी तातडीने महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला आदेश देवून गढूळ व कमी दाबाने पाणी येत आहे, याची माहिती घ्यावी. तसेच, गढूळ पिण्याचे पाणी येण्याचे काय कारणे आहेत, याचा शोध घ्यावा. अशी मागणी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या व्ही.जे.एन.टी. सेलचे कार्याध्यक्ष गुलामअली भालदार यांनी ई-मेल द्वारे आयुक्त राजेश पाटील यांना आज दिले.