ताज्या घडामोडी

मन करारे प्रसन्न- सर्व सिद्धीचे कारण…

कंदिलाच्या बाहेर उजेड जो पडतो तो काचेमुळे की आतल्या ज्योती मुळे? कारण आतली ज्योत विझल्यावर केवळ काचेचा काय उजेड पडणार?

मन करारे प्रसन्न- सर्व सिद्धीचे कारण–कंदिलाच्या बाहेर उजेड जो पडतो तो काचेमुळे की आतल्या ज्योती मुळे? कारण आतली ज्योत विझल्यावर केवळ काचेचा काय उजेड पडणार?

आवाज न्यूज : डॉ. शाळीग्राम भंडारी, तळेगाव दाभाडे,६ नोव्हेंबर.

 आपलंच मन काहीवेळा एखाद्या उधळणाऱ्या उन्मत्त जनावरासारख असत!– अशा या मनाला लगाम घालून त्याच्यावर स्वार होण एखाद्याला जर जमलं तर त्याला यशाचं परीस गवसलं असंच म्हणता येईल!–जनसामान्यात आपली प्रतिमा उजळावयाला हवी असेल तर प्रयत्नपुर्वक आपलंच मन आपल्याला बदलायला हवं! कारण केवळ आमच वर वरचं बोलण वागण बदलून आपल्याला चालणार नाही! मित्रांनो रोजच्याप्रमाणे कपडे बदलल्याने आतला माणूस बदलत नसतो!– नाही तर भगवे कपडे घालणारी सर्वच माणस आपल्याला विरक्त झालेली दिसली असती! माझ्यापुढे नेहमी एक असा प्रश्न उभा राहतो की– कंदिलाच्या बाहेर उजेड जो पडतो तो काचेमुळे की आतल्या ज्योती मुळे? कारण आतली ज्योत विझल्यावर केवळ काचेचा काय उजेड पडणार?

तसंच निर्जीव प्रेताच्या बाबतीत सुद्धा असंच आपल्याला सांगता येईल कारण बांधेसूद रेखीव व सुंदर अवयवांचा समावेश ज्या देहात असेल पण त्यात जर चैतन्य नसेल तर त्याला आपण- अरथी म्हणतो!- म्हणजे असे की– *ज्या रथाचा सारथी निघून गेलेला आहे!–म्हणजेच मित्रांनो ज्या शरीरात चैतन्य अस्तित्वात आहे त्या शरीरातील मनाची शक्ती अपरंपार आहे आणीती सर्व शक्ती जर आपण एकत्र केली तर ती कोंडलेल्या वाफे प्रमाणे अद्भुत असं कार्य करण्यास समर्थ ठरते*!– यातील जिवंत उदाहरण म्हणजे सूर्याची हजारो किरण जर आपण काचेतून एकत्रित करून एका बिंदूत एकवटवली तर त्या एकवटलेल्या केंद्रा खाली असलेला पदार्थ पेट घेतो!– अशाच प्रकारे मनाची हजारो ठिकाणी विभागलेली शक्ती जर आपण एकत्र केंद्रित केली तर त्याच मनाचं सामर्थ्य आपल्यासमोर प्रगट होत!

एका अनुभवी वृद्ध गृहस्थाने एका तरुणास आनंद प्राप्तीसाठी काही गोष्टी एका कागदावर लिहावयास सांगितल्या त्या तरुणाने *यश कीर्ती सन्मान* अशा अनेक गोष्टी लिहून काढल्या पण त्या वृद्ध गृहस्थाच काही समाधान झालं नाही! म्हणून त्याने त्या सर्व गोष्टी खोडून काढल्या आणि आनंद प्राप्तीसाठी लागणारी केवळ एकच गोष्ट लिहिली ती म्हणजे– *मनाची प्रसन्नता*!आणि मित्रांनो ही मनाची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी एकच अट आहे की– आपलं मन कशात तरी गुंतवणे–मित्रांनो वैद्यकीय व्यवसाय करताना शरीररचना ही प्रत्येकाने अभ्यासलेली असते .त्यात सर्व माणसांची हाडामासांची शरीर रचना ही सारखीच असते पण त्याचं परमेश्वराने मन नावाची ही एक देणगी मानवाला बहाल केलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाचा स्वभाव, त्याचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा जरी असला तरी ज्याचं मन प्रसन्न असेल, त्याला जे काही मिळतं, त्यात तो अत्यंत आनंदी समाधानी असतो! कारण संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे___
मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण|
पुढे जाऊन ते असं म्हणतात की__
मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते ||
देवा काही बोल, नाही तुझा तूची काही शत्रु सखा|
ज्याचे निर्मल अंतर तेथे राही विश्वंभर||

मित्रांनो वरील अभंगाला कोणीही अपवाद नाही ,मग तो स्त्री असो वा पुरुष असो, लहान असो वा मोठा असो त्या अत्यंत संवेदनशील मनाला आपण जर जपलं तर त्याच्यासारखा दुसरा आनंद आपल्याला ही नाही व इतरांनाही नाही!
चला तर मित्रांनो वरील अभंगाची सत्यता पडताळून पाहूया_

वर्गातील विद्यार्थ्यांना सरांनी वर्गात येताना गृहपाठ करून यायला सांगितला आहे- ज्यावेळी सर विचारतात की गृहपाठ सर्वांनी करून आणला आहे का? सर्व विद्यार्थी एका सुरात उत्तर देतात होय! पण त्या विद्यार्थ्यात सुरेश नावाचा एक नाठाळ विद्यार्थी असतो त्याने गृहपाठ केलेला नसतो पण सर्वांच्या बरोबर तो खोटं बोलतो! परीक्षा घेण्याच्या उद्देशाने सर म्हणतात की चला दाखवा पाहू तुमच्या वह्या! अशावेळी मात्र सुरेश ची खरोखरच पाचावर धारण बसते कारण वर्गातल्या चाळीस-पन्नास मुलांसमोर आपली फजिती होणार याचा विचार त्याला भेडसावत असतो!

याच विचारानं त्याचं अत्यंत संवेदनशील मन भीतीच्या भावनेने व्याकुळ होतं व त्याचा परिणाम त्याच्या शरीरावर दिसायला लागतो तो असा की ,*त्याला दरदरून घाम फुटतो, छाती धडधडायला लागते, जीभ टाळूला चिकटते, हात पाय थरथर कापायला लागतात* हे सर्व त्याच्या शरीरातील बदल केवळ तो खोटे बोलला या त्याच्या संवेदनशील मनानं पुढे घडणाऱ्या घटनांची मालिकाच त्याच्या मनापुढे उभी केल्यामुळे ती त्याची अवस्था झालेली असते!
असंच एक दुसरं उदाहरण आपल्याला एका आजोबाच सांगतो__ या आजोबांचा खोकला कोणत्याही उपायाने थांबत नव्हता, रक्त तपासण्या पासून एक्स-रे सिटीस्कॅन झालं, सर्व नॉर्मल रिपोर्ट असून सुद्धा आजोबांचा खोकला औषधाला दाद देत नव्हता! शेवटी आम्ही आजोबांना एका मानसोपचार तज्ञ डॉक्टरांना दाखवलं!
त्यावेळी आजोबांनी आपलं मन डॉक्टर समोर मोकळ केलं त्यातून त्यांच्या दुखण्याचा सर्व खुलासा झाला तो अशाप्रकारे__

आजोबांना सहा मुलं पण त्यांच्या रिटायरमेंट नंतर एकही मुलगा त्यांना विचारत नव्हता. कुठलाही आवश्यक असेल तरीही त्यांचा सल्ला घेत नव्हता! त्यामुळे आजोबा सारखे विचार करायचे की मी एखाद्या अडगळीतील पडलेल्या वस्तू सारखा आहे! असं खरं कारण कळल्यानंतर आणि त्यांच्या मुलांना विश्वासात घेतलं आणि त्यानुसार एक प्रयोग करायचं ठरवलं की प्रत्येकाने बाहेर जाताना किंवा बाहेरून आल्यावर आजोबांना नमस्कार करायचा त्यांना दिवसभराचा वृत्तांत द्यायचा त्यांच्याशी सल्लामसलत करायची असा आपल्याकडून 15 ते 20 दिवस प्रयोग करून पहा, आजोबांचा खोकला निश्चितच पूर्ण बरा झालेला आपल्याला दिसेल!

आणि खरोखरच मित्रांनो आजोबांचा खोकला एकही गोळी किंवा औषध न घेता पूर्ण बरा झाला!
या सारखच एक साध उदाहरण म्हणजे सासू-सुनेचं__ एखादी चतुर शहाणी सून काय करते ,ती बाहेर जाताना सासूची औपचारिक परवानगी घेते- सासु दुसऱ्या खोलीत असली तरी तिला रोजचे तांदूळ किती घेऊ डाळ किती घेऊ हे फक्त विचारते पण सर्व आपल्या मनाप्रमाणे करते यात ती सासूच्या अस्तित्वाची दखल घेते हाच विचार सासूच्या मनाला प्रसन्न करण्यासाठी पुरेसा होतो!
मित्रांनो ही सर्व घराण्यातील परंपरा चालीरीती प्रत्येकाच संवेदनशील मन जपण्यासाठीच भारतीय संस्कृतीने अत्यंत अभ्यासपूर्ण पणे स्वीकारलेली आहे! ही सगळी मनाच्या प्रसन्नतेची अनुभूती आपल्यालाही प्राप्त होवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना …

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!