राजकीय बंदोबस्त पोलिसांचा जीव घेणार का ?
सलग बंदोबस्तामुळे पोलिसांचे आरोग्य धोक्यात...!
राजकीय बंदोबस्त पोलिसांचा जीव घेणार का ? सलग बंदोबस्तामुळे पोलिसांचे आरोग्य धोक्यात…!
Will the political settlement kill the police? Police’s health in danger due to continuous security…!
आवाज न्यूज : पुणे, प्रतिनिधी, २५ फेब्रुवारी.
सध्या पुणे जिल्ह्यात दोन विधानसभा पोट निवडणुका सुरू आहेत. राज्यात कधी नव्हे अशा या दोन पोट निवडणुका राजकीय नेत्यांनी प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. पण या निवडणुकीच्या निमित्ताने जो पोलिस बांधवांच्या जीवाशी खेळ सुरू आहे तो कधी थांबेल हे मात्र गुलदस्त्यातच आहे.पोट निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते, अनेक मंत्री, पहिल्या रांगेतील अति महत्वाचे नेते यांची मोठ्या प्रमाणावर कसबा आणि चिंचवड विधानसभा निवडणुकीसाठी रेलचेल सुरू आहे. त्यासाठी लागणारा सलग पोलिस बंदोबस्त यामुळे पुणे जिल्ह्यातील पोलिस बांधवांच्या वर मोठ्या प्रमाणावर मानसिक ताण आला असल्याचे समोर आले आहे. सलग ५ ते ६ दिवसाच्या बंदोबस्तामुळे पोलिसांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिस बांधवांना राजकीय बंदोबस्ताच्या बरोबरच पोलिस ठाण्यात येऊन नाईट कॉबिन ऑपरेशन, ऑल-आऊट ऑपरेशन, गंभीर गुन्हे या संदर्भात तपास करण्याचेही काम करावे लागत असल्याने त्यांना आरोग्याच्या संदर्भात मोठी कसरत करावी लागत असल्याचे समोर आले आहे.
पोलिस ठाण्यात जर महत्वाचे असे महिला अत्याचाराचे, जबरी गुन्ह्यातील आरोपींचा शोध किवा पकडलेल्या आरोपींच्या बाबतचा तपास करायचा असेल तर त्याला प्राधान्य देऊन तो तातडीने करायला हवा. पण या राजकीय बंदोबस्तामुळे गंभीर गुन्ह्यांचे अर्धवट तपास सोडून पोलिसांना राजकीय व्यक्तीच्या दिमतीला उभे राहावे लागत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. हेच राजकीय व्यक्ती एखाद्या गंभीर गुन्ह्याचा तपास वेळेवर झाला नाही तर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. अन गुन्हेगारी वाढली म्हणून बोंबाबोंब सुरू करतात. पण आताच्या राजकीय निवडणुकांत ज्या गंभीर गुन्ह्याचा तपास अर्धवट किवा प्रलंबित राहिला त्याला जबाबदार कोण ? आणि आता गुन्हेगारीचे प्रमाण वाढत नाहीत का? असाही प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्याकडून उपस्थित केला जात आहे.एखाद्या प्रकरणात गंभीर गुन्हा दाखल झाला असेल तर, त्या गुन्ह्याची उकल करण्याला प्रथम प्राधान्य द्यायला हवे. पण राजकीय कार्यक्रम असेल तर कोणताही गंभीर गुन्हा असू देत तो सोडून फक्त पोलिसांनी आमच्या दिमतीला उभे राहावे असेच काहीसे धोरण राजकीय पक्षांनी व नेत्यांनी अवलंबल्याचे सध्याच्या राजकीय परिस्थितीतून दिसून येत आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झाले असल्याने सर्व पोलिस ठाणे व वाहतूक विभाग यांच्यावर मोठ्या प्रमाणावर कामाचा ताण येत आहे. त्यातच शहरातील काही भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो. त्यातच असे राजकीय बंदोबस्त जर नेत्यांना आणि मंत्र्यांना दिले तर सर्व सामान्य नागरिकांना जो त्रास सहन करावा लागत आहे त्याला जबाबदार कोण? हाही प्रश्न अनूत्तरीतच असल्याचे म्हणावे लागेल.सलग बंदोबस्त, शरीराला न मिळणारा आराम, वरिष्ठांचे बरडन, कुटुंबासाठी मिळत असलेला अपुरा वेळ यामुळे पोलिस बांधवांना डिप्रेशन, ऋदयविकार, ब्रेनहार्म्रेज अशा घातक आजारांना बळी पडावे लागत आहे. जर एखाद्या पोलिस बांधवाच्या जीवाचे कमी जास्त झाले तर त्याच्या कुटुंबाची जबाबदारी कुणाची? यावर मात्र हे राजकीय नेते मौन बाळगल्या शिवाय काही बोलायला तयार नाहीत. हे राजकीय नेते एसी गाडीने येतात, पंचतारांकित हॉटेल मध्ये खातात, राहतात पण जे पोलिस बांधव तुमच्या जीवाचे रक्षण करतात त्यांनी काही खाल्ले आहे का? ते कुठे राहतात? त्यांना कुटुंब नाही का? त्यांना मुल-बाळ नाहीत का? त्यांची कुणी घरी वाट बघत नाहीत का? या न अशा प्रश्नावर मात्र कुणी बोलायला तयार नाही. तर का त्यांनी भरती वेळी सेवा बजावण्याची शपथ घेतली आहे आणि ते ती शपथ जिवावर उदार होऊन निभावत आहेत. पण हे राजकीय नेते स्वत: आमदारकी, खासदारकी, मंत्री पदाचीही निपक्षपणे शपथ घेतात पण ते किती शपथ निभावतात यावर न बोललेले बरे राहील.
खरच पोलिसांना कोणत्याही प्रकरणात पिंजर्यात उभे करून त्याच्याकडे द्वेषाने पाहिले जाते. पण त्या पोलिसातला रक्ताचा माणूस कुणी क्वचितच बघतो. हे राजकीय नेते पोलिसांचा फक्त स्व:ताच्या स्वार्थासाठी फक्त एक बाहुला म्हणून उपयोग करतात. त्यातून अनेक पोलिस बांधवांचा जीवही जातो मात्र त्याच्या जीवाचे कुणालाही सोईर सूतक नसल्याचे अनेक घटनाच्या मधून अधोरेखांकित झाले आहे.
एवढा लिहिण्याचा प्रपंच यासाठी की, राजकीय नेते स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी कुणाच्या जिवावर उदार होत असतील तर या पेक्षा हिन राजकारण महाराष्ट्र सोडून इतर कोणत्याही राज्यात होत नसेल. राजकीय नेत्यांना एकच विनंती आहे पोलीसही माणसे आहेत, ते दगड नाहीत, नेतेहो पोलिसांनाही तुमच्या सारखे कुटुंब आहे ते ना ब्रम्हचारी नाहीत..
त्यांच्या जागी स्वत: उभे राहून बघा, स्वत: त्यांच्यातील माणूस अनुभवा मग तुम्ही किती त्यांचे रक्त आटवत आहेत हे तुमच्या लक्षात येईल. शेवटी येवढेच ये पोलीसा रात्रण दिवस राबतो, तुला येत नाही रडू, खाकी कपड्यावाल्या तुझे कर्ज कसे फेडू !!