शिरगुपी ग्रामीण भागात चोरी करताना चोरांचे धारिष्ट वाढले!
येथे एका रात्रीत पाच बंगले फोडले! एकूण दोन लाखाचा ऐवज लंपास! परिसरात भीतीचे वातावरण!
निपाणी तालुक्यातील निपाणी पासून सर्वात जवळ असणारे गाव म्हणून ज्या गावची ओळख आहे. त्या शिरगुपी गावांमध्ये निपाणी शहर व उपनगरात होणाऱ्या चोरी प्रमाणेच एका रात्रीत माळभागावरील पाच बंगले फोडून दोन लाखाचा ऐवज घेऊन चोरट्यानी पोबारा केल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार व सूत्रांच्या हवाले असे समजते की काल बुधवारी पहाटे नजीकच्या शिरगुपी (ता. निपाणी) येथे एका रात्रीत अज्ञात चोरट्यांनी माळभागा तील पाच घरे फोडून सुमारे 4 तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे 2 लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. नूरमहमद बाबासो सरखवास असे दागिने चोरीस गेलेल्या घर मालकाचे नाव आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, माळ भाग येथील रहिवासी कृष्णात मारुती घाटगे, दिलीप महादेव हजारे, नूरमहमद बाबासो सरखवास तर शिरगुपी देसाई प्लॉट मधील श्री पाटील व श्री नाईकवाडे अशी एकूण पाच जणांचे चार बंगले व एक साधे घर चोरट्याने लक्ष केले होते. व हा सर्व चोरीचा प्रकार पहाटेस दोन ते तीन तासाच्या अंतरात घडल्यामुळे परिसरात घबराट पसरली असून भीतीचे वातावरण झाले आहे.
“चोरी झालेल्या पाच घराच्या पाच कहाण्या वेगळ्या, पण चोराऺची चोरीची पद्धत मात्र एकच…”
काल झालेल्या चोरी मध्ये चोरट्यांनी फक्त आणि फक्त बंद घरांना लक्ष करून चोरी केल्यामुळे ही चोरी बरेच दिवस पाळत ठेवून केल्याचे निष्पन्न होते. कारण चोरट्यांनी लक्ष केलेल्या व चोरी करून दोन लाख रुपये लंपास केलेल्या घरांच्या कहाण्या मात्र औरच आहेत.
देसाई प्लॉट मधील श्री पाटील यांच्या घरी कोणीही नव्हते पलीकडील शेजाऱ्यांनी त्यांच्या स्लॅब वर भुईमुगाच्या शेंगा वाळत घातल्या होत्या. त्या सकाळी पाहण्यासाठी जिन्यावरून वर जात असता खालील दरवाज्याचा कडीकोंयडा तोडल्याचे निदर्शनास आले. तर नाईकवाडे यांच्या घरी देखील कोणी नसल्याचे पाहून त्यांच्या घरात प्रवेश केला. माळभागावरील घाटगे कुटुंबीय मुंबईस नातेवाईकांच्या कडे गेले होते त्यांच्या घरी देखील कोणी नव्हते. हजारे यांचे घर नवीनच बांधलेले असून वास्तुशांती न झाल्यामुळे त्यांनी फक्त धान्य ठेवले होते. व ते गावातील घरात राहण्यास होते म्हणजेच ते देखील घर बंदच होते. त्यांचा घराचा देखील कडीकोंयडा उचकटून आत प्रवेश केला. परत त्याच चोरांनी आपला मोर्चा सरखवास यांच्या घराकडे वळवला. हे कुटुंबीय इचलकरंजी येथे राहावयास असल्यामुळे दोन-चार दिवसानंतर कोणीतरी येऊन जात असत. त्या घराचा समोरील दरवाजाचे कडीकोंयडा तोडून आत प्रवेश करून सर्व तिजोरी, बेड व फ्रिज मधील सर्व साहित्य विस्कटून तिजोरीत असलेले साडेतीन तोळे दागिने व रोख रक्कम असा दोन लाखाचा ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.
घटनास्थळी शहर पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी यांच्यासह हवालदार मंजुनाथ कल्याणी यांनी पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद शहर पोलिसांत झाली नव्हती.