भांबर्डे , कुंभेरी ,बारपे, आंबवणे एस टी बससेवा पूर्वतत सुरू करावी – ग्रामस्थांची मागणी
लोणावळा : भांबर्डे , कुंभेरी ,बारपे, आंबवणे, वांद्रे- ऊडूसते व शेडाणी, शिरवली, चांदवली, तैलबला आणि मुळशी धरण परिसरात असलेल्या वाड्या वस्त्या यांमधील ग्रामस्थांसाठी , शालेय विद्यार्थी , महिला , कामगारवर्ग यांचेसाठी एस टी बससेवा पूर्ववत सुरू करावी. तसेच मुळशी मधील गावे व वाड्या वस्तीला जाणाऱ्या एस टी बसेस सुरू करून ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी ,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
एस टी बसेस पूर्वी लोणावळा बसस्थानकातून व पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकामधून सुटत असत. त्यामुळे मुळशीमधील खेड्यात राहणाऱ्या ग्रामस्थांची दळणवळणाची सोय होत होती. या बसेस नसल्याने मुळशी व मावळचा लोणावळ्यातील संपर्क तुटला..शालेय विद्यार्थी व महिला यांना एस.टी शिवाय पर्याय नाही.ज्यांचेकडे मोटारसायकल व कार आहे , त्यांना माञ या मार्गाऐवजी ताम्हीनी घाटमार्गे किंवा हिंजवडी पौड मार्गे लोणावळ्यातील बाजारपेठ येथे ये जा करण्यासाठी सुमारे १३८ किलोमीटर चा प्रवास करावा लागतो वीस बावीस किलोमीटर ऐवजी शे सव्वाशे जादा किलोमीटर अंतरावर प्रवास केल्यामुळै मोटारसायकल स्वार व कारचालक यांचे मणका आणि पाठदुखी या आजाराने हैराण होत असून पेट्रोल व डिझेलचे भाव शंभरीपार गेले असल्यामुळे खिशाला परवडेनासे होत आहे.
बारपे, गुटके , कुंभेरी ,वडुस्ते तसेच तेलबैला ,पोमगाव , आंभवणे आणि भांबर्डे या गावांना जा – ये साठी सकाळी दुपारी व वस्तीला बससेवा फेरी वाढवून ग्रामस्थांचे जगणे सुखकर करावे, तसेच या भागातील रस्ते दुरूस्त करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी तसेच कामगारनेते मोरेश्वर मातेरे यांनी केली आहे.
आवाज प्रतिनिधीने या मुळशी ग्रामस्थांचे व प्रवाशी यांचेशी संवाद साधला असता ; ग्रामस्थांनी या भागात पूर्वी ज्या बसेस सुरू होत्या ,त्या पुन्हा बसेसच्या फेरी व वस्तीला जाणाऱ्या बस सुरू कराव्या ,अशी मागणी केली आहे.