विविध क्षेत्रातील सेवानिवृत्त कामगारांच्या, पेन्शनमध्ये वाढ करावी- सुरेश केसरकर
आरोग्य विषयक सेवा मोफत व त्वरीत मिळण्यासाठी प्रयत्न चालू!
———————————————————————-
कोल्हापूर : प्रतिनिधी (12 मार्च)
ई.पी.एस्. ९५ या राष्ट्रीयीकृत संघटनेच्या वतीने संपूर्ण देशभरात विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सेवानिवृत्त जेष्ठ कामगारांना रुपये सात हजार पाचशे व डी. ए. अशी पेन्शनमध्ये वाढ करावी, त्यांना आरोग्य विषयक सेवा मोफत व त्वरीत देणेत याव्यात, सरकारी कर्मचाऱ्यां प्रमाणे सातत्याने पेन्शनमध्ये वाढ करावी, जेष्ठ नागरीकांना रू. पाच हजार इतकी पेन्शन द्यावी, अशा आशयाचे निवेदन आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, कामगार मंत्री भुपेंदरसिंग यादव, अर्थ मंत्री निर्मला सितारामन, तसेच कोल्हापूरचे निवासी जिल्हाधिकारी संजय तेली व भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे प्रबंधक अमित चौगुले आदींना देण्यात आले.
देशातील विविध क्षेत्रातील सेवानिवृत्त कामगार एकत्र येऊन, देशाचे पंतप्रधान व कामगार मंत्री यांच्याशी सातत्याने चर्चा करून देखील यावरती आश्वासनाखेरीज कांहीच तोडगा निघालेला नाही. देशातील अनेक खासदारांनी याबाबत संसदेच्या अधिवेशनामध्ये मागणी करून देखील केंद्र सरकारने या कामगारभिमुख मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे, सदरचे निवेदन आज देण्यात आले.
आजवर जेष्ठ कामगारांनी विविध करांच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावलेला आहे. सर्व सेवानिवृत्त कामगार ही देशाची संपत्ती आहे. त्यांना वृद्धापकाळात मान सन्मान मिळावा, यासाठी सातत्याने केंद्र सरकारकडे लेखी स्वरुपात मागणी व प्रत्यक्ष चर्चा करून देखील याबाबत केंद्र सरकार उदासीनता का दाखवत आहे ? असा प्रश्न पडतो.
सध्या अनेक सेवानिवृत्त कामगारांना ८०० ते ३००० रुपये इतक्या अल्प प्रमाणात पेन्शन मिळते. त्यामुळे अनेक सेवा निवृत्त कामगारांवर उपासमारीची व आर्थिक समस्यांना सामोरे जायची वेळ आलेली आहे. अनेकांना वृद्धाश्रमात तसेच अनाथ आश्रमामध्ये आपले जीवन व्यतीत करावे लागत आहे. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ च्या लोकसभेची आचारसंहिता लागू होणे पूर्वी, सेवानिवृत्त कामगारांच्या निवृत्ती वेतनामध्ये वाढ करावी यासाठी, ई.पी.एस्. ९५ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत, एस. एन. आंबेकर व अच्युतराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे निवेदन देण्यात आले.
यावेळी शिष्ट मंडळामध्ये सुरेश केसरकर, अनिता काळे, भगवान माने, दत्तात्रय पाटील, बाळासाहेब कांबळे, संजय गुरव, वसंत बोराडे आदी उपस्थित होते.