मावळ मधील साते येथे भरधाव टेम्पोच्या धडकेत 26 वारकरी जखमी: दोन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
कान्हे : मुंबई-पुणे महामार्गावरील साते गावच्या हद्दीत पायी आळंदीला निघालेल्या वारकऱ्यांना एका भरधाव टेम्पोने धडक दिल्याने 26 वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. तर दोन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज (27 नोव्हेंबर) रोजी सकाळी सव्वा सहाच्या सुमारास घडली.
वारीतील जखमींना कामशेत येथील महावीर हॉस्पिटल, बढे हॉस्पिटल, सोमाटणे येथील स्पर्श हॉस्पिटल व पवना हॉस्पिटल तसेच कान्हे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे.
मृतांमध्ये जयश्री आत्माराम पवार (वय 55) आणि कुसुम वाळकु यरम (वय 52) या महिला वारक-यांचा समावेश आहे.
कार्तिकी एकादशीसाठी उंबरे (ता. खालापूर) येथील सुमारे दोनशे वारकरी पायी आळंदीच्या दिशेने चालले होते. नायगाव येथील गुरुदत्त मंगल कार्यालयात काल रात्री मुक्काम होता. पहाटे पालखीने आळंदीकडे प्रस्थान केले. सकाळी सव्वा सहाच्या सुमारास दिंडी सातेगाव जवळ आली असता भरधाव वेगाने आलेला पिकअप टेम्पो पाठीमागून वारीमध्ये घुसून भीषण अपघात घडला.
जखमींवर उपचार सुरू आहेत. पुढील तपास वडगाव पोलिस करत आहेत.