घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ ‘संविधान दिन’ स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये उत्साहात साजरा
तळेगाव : श्री.डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये काल (दि 26 नोव्हेंबर)रोजी ‘राष्ट्रीय विधी दिन’ म्हणजे ‘संविधान दिन’ आयोजित करण्यात आला .कार्यक्रमाची सुरुवात शालेय मुख्याध्यापिका शमशाद शेख मॅडम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कुमारी दीक्षा गायकवाड हिने संविधानाचे सुरेख वाचन केले. तसेच संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन घेण्यात आले .’संविधान दिन’ या विषयी शालेय शिक्षिका प्रियंका पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताने संविधान स्वीकारले व ते 26 जानेवारी 1950 रोजी भारतभर लागू झाले याविषयी सविस्तर माहिती दिली .
भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ साजरा होणाऱ्या संविधान दिनाची मूलतत्वे व महत्त्व शालेय पर्यवेक्षिका रेणू शर्मा यांनी सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना सांगितली.
शालेय स्तरावर संविधान दिनाचे औचित्य साधून ‘माझे संविधान, माझा अभिमान’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमा अंतर्गत भारतीय संविधान रांगोळी, चित्रकला, वक्तृत्व ,निबंध, पोस्टर निर्मिती, संविधानावर आधारित प्रश्न मंजुषा हे उपक्रम घेण्यात आले. या उपक्रमांमध्ये पाचशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासह भारतीय संविधानाच्या निर्मितीत हातभार लावलेल्या तमाम व्यक्तिमत्त्वांना अभिवादन करणे ,आदरांजली वाहणे; त्याचप्रमाणे संविधानातील मूलतत्वे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे व त्यांना जागरूक नागरिक बनवणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
सदर कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शालेय मुख्याध्यापिका शमशाद शेख मॅडम, पर्यवेक्षिका रेणू शर्मा यांनी केले.सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी, शाळेतील सर्व उपस्थित विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शालेय शिक्षिका विजयमाला गायकवाड यांनी केले.
डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष खांडगे ,सचिव मिलिंद शेलार शालेय समिती अध्यक्षा रजनीगंधा खांडगे आदींनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.संविधानातील कायद्याचे, नियमांचे पालन करून या दिनाचे सार्थक करूया असा संकल्प करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.