ताज्या घडामोडी

निसर्गाचे नियम समजून घेऊन विकास कामांचे नियोजन आवश्यक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माझी वसुंधरा अभियानामध्ये सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि अधिकाऱ्यांना पारितोषिकांचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माझी वसुंधरा अभियान 2021-22 चा शुभारंभ वन विभागाच्या ‘बायोसेंटिनल्स ऑफ कोस्टल महाराष्ट्रा’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन माझी वसुंधरा अभियान गीताचे विमोचन

आवाज न्युज : पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करण्याचा संस्कार आपल्या भारतीय संस्कृतीने दिला असून विकास कामांचे नियोजन करताना ते निसर्गाचे नियम समजून घेऊन करणे आवश्यक आहे. अन्यथा निसर्ग आपल्या पद्धतीने न्याय देण्याचे काम करतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

आज मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात २०२०-२१ या वर्षात “माझी वुसंधरा ” अभियानात सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदा, अमृत शहरांचा तसेच अभियानात सर्वोत्कृष्ट काम करणारे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या अभियानाच्या २०२१-२२ या वर्षातील अंमलबजावणीचा शुभारंभही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते

कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीरकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे, माझी वसुंधरा अभियान संचालक सुधाकर बोबडे यांच्यासह अभियानात सहभागी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि गाव आणि शहर पातळीवर अभियानात सहभागी होऊन काम करणारे कार्यकर्ते, प्रशासनातील अधिकारी सहभागी झाले होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वन विभागाच्या कांदळवन कक्षाने तयार केलेल्या “बायोसेंटिनल्स ऑफ कोस्टल महाराष्ट्रा” या कॉफीटेबल बूकचे प्रकाशन करण्यात आले.

आपल्या आयुष्यातील पर्यावरणाचे महत्व वेगळ्याने सांगण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करतांना मुख्यमंत्री म्हणाले की, शहरातून हरित तृणांची मखमल आता नाहीशी झाली आहे. आपण पृथ्वीला वसुंधरा म्हणतो आणि तिची गणना स्क्वेअर फुटात करतो. वन बिएचके टु बिएचके सारख्या तुकड्यांमध्ये ती वाटतो. पण विकासाचा हा असा हव्यास आपल्या जीवनाला घातक ठरत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी आपण पंचमहाभूतांपासून दूर जात असल्याचे सांगतांना त्यांची जपणूक करण्याऐवजी आपण त्यांच्यावर हुकमत गाजवत असल्याचेही म्हटले. कोरोनाकाळात आपल्याला ऑक्सीजनचे महत्व पटले, आपण ऑक्सीजन निर्मिती करत आहोत, पण निसर्गाने दिलेले झाडांच्या रुपातील नैसर्गिक ऑक्सीजन प्लांट आपण उध्वस्त करत चाललो आहोत याकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.

आपली संस्कृती ही पर्यावरणाची जपणूक करणारी संस्कृती होती, त्यामुळेच आपल्याकडे वटपौर्णिमेला वडाची पुजा, नागपंचमीला नागांची पुजा केली जाते. आपल्या पुर्वजांनी पंचमहाभूतांचे रक्षण केले परंतू आता आपल्या घरासमोर साधे तुळशीवृदांवन बांधण्याला जागा नाही, इतक्या इमारती उभ्या राहात आहेत. कांदळवनात भव्य अशी जीवसृष्टी दडलेली आहे, वन आणि वन्यजीवांचे, पर्यावरणातील प्रत्येक सूक्ष्म घटकांचे महत्व आणि त्याचे रुप आपण समजून घेणे गरजेचे आहे आणि ते समजून घेता येत नसले तरी ते जपण्याची आणि त्याचे संवर्धन करण्याची गरज आहे, तिथे कुणीही कमी पडता कामा नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी केले. माझी वसुंधरा अभियानात सहभागी होऊन पारितोषिक मिळवलेल्या सर्व पुरस्कार्थींचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. तसेच अभियानात सहभागी होऊन उत्तम काम करणाऱ्या आणि सहभाग नोंदवणाऱ्या गाव – शहरातील संस्थांचा, कार्यकर्त्यांचा आणि सर्व सहभागीदारांचा त्यांनी गौरव केला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!