आनंद अश्रूंचे मुल्य श्रेष्ठ…..डॉ. श्रीपाल सबनीस
नरसिंह भोसले यांच्या ‘जन्म ते पुनर्जन्म’ पुस्तकाचे प्रकाशन
पिंपरी –सुसंवादाचे मुल्य पेरुन मनातील कलुषितपणा घालविण्यासाठी वाचन महत्वाचे आहे. सध्याच्या परिस्थितीत जीवनमुल्य सांगणा-या साहित्याची नवनिर्मिती व्हावी. हि काळाची गरज आहे. हे ओळखून ‘आनंद अश्रूंचे मुल्य श्रेष्ठ’ असल्याचा संदेश देणारे नरसिंह भोसले यांचे ‘जन्म ते पुनर्जन्म’ हे पुस्तक सर्व वयोगटातील वाचकांना मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
निवृत्त पोलिस अधिकारी नरसिंह भोसले लिखित ‘जन्म ते पुनर्जन्म’ या पुस्तकाचा प्रकाशन सभारंभ मंगळवारी (दि. 29 जून) नवी पेठ येथिल पत्रकार भवनाच्या सभागृहात डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाला. यावेळी शांतीदूत परिवाराचे संस्थापक, निवृत्त पोलिस अधिकारी डॉ. विठ्ठल जाधव, ज्येष्ठ कृषीतज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, महाराष्ट्र राज्य साहित्यिक सांस्कृतिक मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. रतनलाल सोनग्रा, लेखक नरसिंह भोसले आदी उपस्थित होते.
डॉ. सबनीस पुढे म्हणाले की, आदर्श संस्काराचे अचुक मार्गदर्शन करीत धर्म निरपेक्षता, भूतदया, लिंगभेद न मानणे, उदारमतवादी लोकशाही मुल्ये, वैज्ञानिकता या घटकांविषयी मार्मिक टिपणी भोसले यांनी या पुस्तकात केली आहे. हे पुस्तक म्हणजे संस्कारशाळाच आहे. विद्यार्थी दशेतील धोके व त्यावरील उपाय, यशवंत होण्याची गुरुकिल्ली, जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग यातून मिळतो. भोसले यांचे हे लेखन इतर निवृत्तीधारकांना प्रेरणा देणारे आहे असेही डॉ. सबनीस म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. विठ्ठलराव जाधव म्हणाले की, लेखकाने या पुस्तकात जेनेटिक कौन्सिलींग पासून उत्तम पालकत्व, शाळा महाविद्यालयीन सावधानता, आर्थिक नियोजन, तणावाचे व्यवस्थापन, आरोग्य, प्राणायामाचे महत्व, अर्थ नियोजन, वीमा संरक्षण, व्यावहारीक मार्गदर्शन, इकेगाई आणि कायझेन अशा विविध मुद्यांवर सविस्तर मार्गदर्शन करणारे विवेचन केले आहे.
या पुस्तकाला डॉ. श्रीपाल सबनीस यांची प्रस्तावना असून, मा. अप्पर पोलिस महासंचालक व साहित्यिक डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
स्वागत, प्रास्ताविक नरसिंह भोसले, सुत्रसंचालन विजय बोत्रे आणि आभार सविता इंगळे यांनी मानले.