कृषी कायद्याविरोधात भारत बंद आंदोलन ; लोणावळा काँग्रेसचा रस्ता रोको
लोणावळा : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याविरोधात आज (27 सप्टेंबर) रोजी भारतीय कॉंग्रेसच्या वतीने देशभरामध्ये बंद पुकारण्यात आला आहे. लोणावळा शहर काँग्रेसने या बंदला पाठिंबा देत मुंबई – पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
कुमार चौकात अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करून काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणा दिल्या. गवळीवाडा नाक्यावर पूर्ण बंद तर बाजारपेठेत अंशता बंद पाळण्यात आला.
लोणावळा शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनावेळी जाचक कृषी कायद्याने शेतकरी व पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसच्या वाढत्या किमतीने सर्वसामान्य नागरिक पुरता भरडला आहे. देशातील कोट्यवधी युवक बेरोजगार झाले आहेत सरकारी आस्थापनांचे खाजगीकरण सरकार करत आहे शेतकरी विरोधी कायदे, महागाई बेरोजगारी या बाबत सरकार कोणतीही भूमिका घेत नाही यामुळे सरकारने सत्तेतून पायउतार व्हावे अशी मागणी लोणावळा शहर अध्यक्ष प्रमोद गायकवाड तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणीस निखिल कवीश्वर व पदाधिकाऱ्यांनी केली
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणीस निखिल कवीश्वर, महिला अध्यक्षा पुष्पा भोकसे, उपनगराध्यक्षा संध्या खंडेलवाल, माजी उपनगराध्यक्ष सुधिर शिर्के, युवक अध्यक्ष दत्ता दळवी, गटनेत्या आरोही तळेगावकर, नगरसेविका पूजा गायकवाड, सुवर्णा अकोलकर, उषा चौधरी, ज्येष्ठ नेते वसंत भांगरे, नासीर शेख, जंगबहादुर बक्षी, ओबीसी अध्यक्ष आकाश परदेशी, अल्पसंख्यांक अध्यक्ष जाकीर शेख आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.