नवरात्रौत्सव मंडळाने रक्तदान शिबिर आयोजनातून जपली सामाजिक बांधिलकी
तळेगाव : कोरोना संकट कमी झाले असले तरी धोका अजुनही टळला नाही. त्यामुळे नवरात्रामध्ये गरबा-दांडिया याचे आयोजन न करता आरोग्यविषयक उपक्रम राबवण्याचे आवाहन शासनामार्फत करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत तळेगाव दाभाडे येथील वरद विनायक मंडळ,(मनोहर नगर) जय गणेश मित्र मंडळ, श्री स्वामी समर्थ मित्र मंडळाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
रक्तदात्यांचा या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. कोरोना महामारीच्या काळात कमी झालेली रक्तदान शिबिरे आणि त्यामुळे निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत गणेश काकडे, अमित दाभाडे, सुनील कारंडे आणि संदीप काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याचे वरदविनायक नवरात्रौत्सव मंडळाचे अध्यक्ष अक्षय दाभाडे यांनी सांगितले.