नगरसेवकांची संख्या 17 टक्क्यांनी वाढणार ; मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई : राज्यात झपाट्याने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन महानगरपालिका व नगर परिषदांमधील निर्वाचीत सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
मोठ्या शहरांप्रमाणेच छोट्या शहरांमध्येही विकासाचा दर झपाट्याने वाढविण्याची आवश्यकता असल्याने मुंबई शहर वगळता इतर सर्व नगरपरिषदा आणि महानगरपालिकांमध्ये एकूण सदस्य संख्यांच्या 17 टक्के वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला.
सध्या नगरसेवकांची किमान आणि कमाल संख्या 2011 च्या जनगणनेनुसार निर्धारित करण्यात आलेली आहे. कोरोना संकटामुळे 2021 जनगणनेचा अहवाल आलेला नाही. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येची सरासरी लक्षात घेऊन आणि शहरांचा झपाट्याने विकास करण्यासाठी नगरसेवकांच्या संख्यामध्ये 17 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.