मावळ तालुक्यात पावसाचे सावट; शेतकरी वर्ग चिंतेत
कामशेत : मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून भात कापणीला सुरुवात झाली आहे. सध्या भात कापणी, मळणी तसेच ऊस तोडणी सुरू आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी हवामान विभागाने राज्यात पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यासह मावळ तालुक्यात ढगाळ वातावरणासह अधून मधून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
यामुळे काही ठिकाणी शेतीची कामे ठप्प तर काही ठिकाणी संथ गतीने सुरू आहेत. ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. जर पाऊस झाला तर हाताला आलेलं पीक खराब होण्याची शक्यता शेतकरी वर्तवत आहेत.
मावळ तालुक्यात भात पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे मावळ तालुक्यातून भाताला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र, ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी भात कापणीला उशीर करीत आहेत. भात कापले तर पावसाचे संकट आणि नाही कापले तर झडण्याचे संकट शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहे त्यात भात कापणीसाठी मजुरांची कमतरता असल्याने शेतकरी राजा चिंताग्रस्त आहे.