कामशेत पुलाजवळ गर्दी ; पावत्या करताना दिसत नाही वर्दी
कामशेत : कामशेत शहर हे मावळ तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असून येथे नेहमीच वाहनांची वर्दळ पाहावयास मिळते. कामशेत मधील छत्रपती संभाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक व गणपती चौक येथे नेहमीच वाहनांची गर्दी बघायला मिळते त्यामुळे ह्या तीनही चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन रस्ता अक्षरशः बंद पडलेला आढळून येतो.
कामशेत शहरातील उड्डाणपुलाजवळ काही महिन्यांपूर्वी दंडात्मक कारवाई पोलीस प्रशासनाकडून होत होती परंतु काही दिवसांपासून कामशेत पोलीस वाहतूक नियंत्रण करताना दिसत नाहीत. त्यामुळे रस्त्यावरील वाहने दुकानासमोर कुठेही लावून जाणे, रस्त्यात काही स्वयंघोषित “पुढारी” लोक गाड्या लावून गप्पा मारणे ह्या मुळे कामशेत मध्ये वाहतूक कोंडी सातत्याने बघायला मिळते.
कामशेत शहरातील रेल्वे स्थानकाजवळ महाविद्यालय आहे. महाविद्यालय सकाळी सुटल्यानंतर काही “रोड रोमिओ” आपल्या भरधाव गाड्या घेऊन चमकोगिरी करत असतात. त्यामुळे महाविद्यालयच्या विद्यार्थिनी त्रस्त असतात. अशाच काही रोड रोमिओ मुळे वाहतूक कोंडी वाढताना पाहायला मिळते. आता ही कोंडी कशी फुटणार हा सवाल कामशेतकरांना पडला आहे.